लोणार तालुका ओला दुष्काळ जाहीर करा: राष्ट्रवादीची मागणी

breakingmah 2 Min Read
2 Min Read

लोणार (तालुका प्रतिनिधी):- या वर्षी संततधार पावसामुळे लोणार तालुक्यातील शेतकरी ऐन सोंगणी व काढणीस आलेले मुख्य पीक सोयाबीन हे जवळपास 95% नुकसान झाले असून पीक पूर्णपणे खराब झाले आहे. तरी या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्ह्यासह लोणार तालुका ओला दुष्काळ जाहीर करून जास्तीत जास्त मदत करा, अशी मागणी 20 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अक्षय पाटील गायकवाड यांनी लोणार तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात संपूर्ण आढवड्यात जवळपास सगळेच शेतकरी सोयाबीन सोंगणी ला लागले असून शेतात सोंगणी नंतर सोयाबीन सोंगलेली असताना अचानक 16 आणि 17 ऑक्टोबर ला दिवस रात्र पावसाने धुवाधार बॅटिंग केली,त्यामुळे शेतात पसार असलेली सोयाबीन वाहून गेली, उरलेल्या सोयाबीनच्या घुगऱ्या झाल्या, काहींनी सुड्या लावल्या होत्या त्यामध्ये पाणी शिरले ,तर काही सुड्या सुध्दा वाहून गेल्या. बळीराजाने खरीप हंगामात पेरणीसाठी पैसे उसनवारी घेतले काहींनी तर आपल्या घरातील दागदागिने बँकेत ठेवले. ऐन दिवाळीच्या सण, मुलगी माहेरी येणार, नातू जावई येणार आता कशी दिवाळी करणार, तर पावसाने बळीराजाच्या तोंडातला घास ओढून घेतला. ज्या पाण्याला अमृत म्हणायचो ते आता आमच्या साठी विष बनलंय अश्या संकटात बळीराजा सापडला आहे हे माय बाप सरकार नक्कीच आमच्या मदतीला धावून येईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे,तरी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून भरघोस शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस युवा नेते अक्षय पाटील गायकवाड यांनी केली आहे यावेळेस राष्ट्रवादी कांग्रेस चे संपूर्ण तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version