सप्तशृंगी गडावर कीर्तिध्वज फडकला!

editor 6 Min Read
6 Min Read

वणी / आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील गडावर नवरात्रीची सांगता महानवमीने होते. या दिवशी दुर्गा देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. कमळावर विराजमान माता सिद्धिदात्री आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. महानवमीचा दिवस खूप खास आहे. या दिवशी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कन्यापूजा करावी. लहान मुलींना देवीचे रुप मानले जाते. त्यामुळे त्यांची पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. याशिवाय नवमीच्या दिवशी हवन करणे देखील शुभ मानले जाते. महानवमी दिनी सप्तशृंगी गडावर कीर्तिध्वज ध्वज फडकला. श्रींचे दर्शनास सुमारे ४० हजारावर भाविकांनी गर्दी केली.

आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या महानवमी निमित्त श्री सप्तशृंगी देवीची महापूजा ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, देणगीदार भाविक अरविंद कल्पे यांनी सपत्नीक केली. सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. प्रसंगी डी.एफ.ओ. उमेश वावरे, आमदार सुहास कांदे, आमदार दिलीप मोहिते, नाशिक जिल्हा परिषदच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी लीन बनसोड, विश्वस्त संस्थेचे विश्वस्त बंडू कापसे, विश्वस्त अॅड. ललित निकम, विश्वस्त डॉ प्रशांत देवरे, विश्वस्त भूषणराज तळेकर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. यांसह यंत्रणा होम गार्ड सोबत पोलिस कार्यरत होते. परंपरेने अश्र्विन नवमीस सप्तशृंगगडावर देवीच्या शिखरावर मध्यराञी ध्वज लावला जातो.

दरेगाव येथील गवळी परिवार या ध्वज लावण्याचे मानकरी असुन गेल्या कित्येक वर्षापासुन हा अदभुत सोहळा पार पाडण्याचे काम हे परिवार करीत असुन, या शिखरावर जाण्यासाठी कुठुनही रस्ता नाही. सरळ शिखरावर जाणे म्हणेज मुत्युला आंमञण देणे असे आहे पण कसलीही दुखापत न होता हे कार्य गेल्या कित्येक वर्षा पासुन गवळी परिवार पार पाडत आहे. हा सोहळा बघणे म्हणेज डोळयाचे पारणे फेडणारा सोहळा असतो. या ध्वजाची विधीवत पुजा देवी संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, ध्वजाचे मानकरी गवळी परिवार सदस्य, विश्वस्त तथा कळवण तहसीलदार बंडू कापसे, विश्वस्त् अॅड. ललित निकम, विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे, विश्वस्त भूषणराज तळेकर, उपविभागीय अधिकारी गणेश मिसळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, सप्तशृंगगड ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार, गावाचे माजी पोलीस पाटील शशिकांत बेनके यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासकीय प्रतिनिधी, कर्मचारी, पुजारी, रोप वे कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

या ध्वजासाठी मध्यराञी १२ वा शिखरावर जाऊन तेथील पुजा विधी करण्यासाठी १० फुट लांब काठी ११ मीटर केशरी कापडाचा ध्वज पुजेसाठी गहु, तादुळ, कुंकु, हळद जाणाऱ्या मार्गातील विविध ठिक ठिकाणी देवतांसाठी लागणारे साहित्य नैवेद्य आदिसह साहित्य घेऊन जावे लागते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात किर्ती ध्वजाची विधिवत पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते करून किर्तीध्वजाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर हा ध्वज फडकिविण्यासाठी दरेगावचे गवळी पाटील मार्गस्थ झाले. समुद्र सपाटी पासून ४ हजार ५६९ फुट उंचीवर सप्तशृंगगड आहे. वर्षभरातून दोन वेळा हा किर्तिध्वज सप्तशृंगी देवीच्या शिखरावर फडकीवला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री व नवरात्रौत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीच्या मध्यरात्री भगवे निशाण शिखरावर फडकीवले जाते. दरेगावचे गवळी पाटील, सप्तशिखरांचा सुळका चढून निशाण लावतात. जाताना मार्गातील देवतांची पूजा करण्यासाठी ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य इत्यांदी वस्तू ध्वज फडकीवणार्या कडे दिल्या जातात. दुपारी साधारण ४.३० च्या सुमारास गावातून किर्तीध्वजाची वाजत गाजत मिरवणूक निघाली. त्यानंतर सायंकाळी ६:३० वाजता देवी भगवतीच्या मंदिरात पोहचून पाटील देवीसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर पुढील मार्गासाठी रवाना झाले.

या सोहळ्यात उतरेकडील सुळक्यावरून पाटील शिखरावर पोचतात, रात्र असतानाही त्यांनी टेंभा किवा प्रकाशासाठी लागणारे कोणतेही उपकरण सोबत न घेता ते जातात. पाटील ज्या शिखरावर जातात तो रस्ता बऱ्याच भाविकांनी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला किवा कुन्हा समोर नाही आला. शिखरावर पोचल्यानंतर जुना ध्वज काढून त्यांनी तेथे नवा ध्वज लावला. शिखरावर चढण्यासाठी त्यांना ६ ते ७ तासाचा कालवधी लागतो दरेगावचे गवळी पाटील पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान शिखरावरून त्यांचे मंदिरात आगमन होताच भाविक दर्शन घेऊन आज परतीच्या मार्गाला लागतील. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात या परंपरेला वैशिष्ट्य मानले जाते ५०० ते ६०० वर्षापेक्षा आधिक हि परंपरा राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीच्या पवननगरीत अखंडपणे चालू आहे. दरम्यान देवी मंदिर सभामंडपात सायंकाळी पाचला शतचंडी याग व होमहवन विधी कार्यक्रमास पुरोहितांच्या मंत्रघोषात प्रारंभ झाला. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी खान्देस, मराठवाडा, विदर्भ नव्हेच तर गुजरात, राजस्थान व ईतर राज्यातून भाविकांनी हजेरी लावली.

महाराष्ट्रासह विविध राज्यातील आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र उत्सव दरम्यान पुरोहित वर्ग, सर्व ट्रस्ट कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, यांसह जिल्हा पोलीस व महसूल प्रशासन विभाग आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

Share This Article
Exit mobile version