शिंदे – फडणवीस सरकार हे लूट करणारे सरकार : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली टीका

breakingmah 2 Min Read
2 Min Read

पैठण -(प्रतिनिधी):- दोन तीन मंत्री हे संभाजीनगर जिल्ह्यात असून देखील अतिवृष्टीमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या यादीत मतदारसंघाचे नाव नाही हे खेदजनक असल्याचे म्हणत शिंदे फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बेरोजगारांच्या विरोधात असून लूट करणारे सरकार असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. आज 24 सप्टेंबर पैठण येथे आयोजित मेळाव्यात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

एकनाथांच्या पावन भूमीला गदार हा डाग लावला हे येथील जनता कदापि विसरणार नाही. पैठण तालुक्यातील जनता ही स्वाभिमानी आहे. त्यांना त्यांची जागा जनता दाखवून देईल असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी नाव न घेता मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने सहा वेळा आमदार होऊन त्यांच्याच विरोधात गदारी केली, हे शिवसैनिक व जनता खपवून घेणार नाही. ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालात त्यांच्याशी नमक हरामी करणारे जनतेची काय सेवा करणार असा खोचक सवाल दानवे यांनी उपस्थित केला. मतदारसंघातील सर्व कंत्राट ही जावयाच्या नावे देत असल्याचा गंभीर आरोप करत दानवे यांनी गुरमी येऊ देऊ नका, जास्त बोललात तर थोड्याच दिवसात तुमची गुरमी उतरवल्याशिवाय पैठणची जनता शांत बसणार नाही असा इशारा भुमरे यांना दिला.एका रस्त्याचे दोन वेळा भूमिपूजन करून कोणता विकास साधता असा संतप्त सवाल दानवे यांनी पैठण येथील भूमिपूजन कार्यक्रमावर उपस्थित केला. शिवसेनेवर टीका करू नका आणि जर केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल हे विसरू नका असा सज्जड दमही त्यांनी विरोधकांना भरला. गदारांना नेस्तनाबूत करण्याचा संकल्प करा, संघटना वाढीसाठी प्रयत्न करा अशा सूचना यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

Share This Article
Exit mobile version