आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आळंदी नगरपरिषद हद्दीतील भाविक, नागरिकांची सुरक्षितता जोपासण्याचे कार्याचा भाग म्हंणून सार्वजनिक रस्त्यावरील, जागेतील मोठ्या प्रमाणात भटकणार्या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आळंदी शहर भाजपचे संघटन सरचिटणीस भागवत काटकर यांनी केली आहे. या संदर्भात आळंदी शहर भाजपचे वतीने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आल्याचे भागवत काटकर यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने रामराव खरात यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी शिवा संघटनेचे शहर अध्यक्ष सदाशिव साखरे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष कारेकर, राहुल घोलप, सुलतान शेख आदी उपस्थित होते.
आळंदीतील नागरिकांकडे वैयक्तिक मालकीचे कुत्रे असतील त्यांचे गळ्यात पट्टे आणि त्यांचे पासून नागरिकांना, शेजारी यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचनादेश नगरपरिषदेने काढावेत. तसेच खाजगी कुत्रे यांची अभिलेखात नोंद नसल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. भाविक, नागरिक तसेच शालेय मुले यांचे सुरक्षिततेस प्राधान्य देऊन तात्काळ उपाय योजना न केल्यास या मागणीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रदक्षिणा रोडवर भटक्या कुत्र्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. प्रदक्षिणा मार्गावरील श्री विठ्ठल रुख्मिणी चौकात शाळा आणि क्लासेस साठी ये- जा करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर ही मोकाट कुत्री सर्रास धावून जातात. यामुळे अनेक लहान मुलेही यांची शिकार ठरतात. यामुळे प्रशासनाने वेळीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर पाळीव कुत्रे पण नागरिक रस्त्यावर, शेजारील मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी त्यांना शौचालय करण्यास घेऊन जातात. यामुळे शेजारील लोकांना देखील याचा त्रास सहन करावा लागून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यामुळे नागरिक मोकाट कुत्र्याच्या त्रासास वैतागले असून, नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे.

