-साच्याशिवाय काळ्या मातीत हाताच्या कौशल्याने साकारताहेत गणेशमूर्ती!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : हल्ली सण-उत्सव साजरे करताना आपण निसर्ग व पर्यावरणाला कुठल्या धोकादायक टप्प्यावर आणून सोडले आहे, याचा अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. चोहीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसचा (पीओपी) बेसुमार शिरकाव, थर्मोकोलचा झगमगाट आणि रासायनिक रंगांचा अतिवापर यामुळे नद्या, तलाव आणि विहिरींचा श्वास गुदमरून गेला आहे. अशा प्रदूषणकारी आणि कृत्रिम गर्दीतही निसर्गाचा समतोल राखत मातीशी असलेले आपले पवित्र नाते जपण्याचे धाडस तालुक्यातील देऊळगाव माळी येथील एका निष्ठावंत मूर्तिकार कुटुंबाने दाखवून दिले आहे. ज्येष्ठ मूर्तिकार हरिभाऊ राऊत आणि त्यांच्या परिवारातील तिसरी पिढी आजही कोणतीही रासायनिक भेसळ न करता, तसेच साच्याचा (डायचा) जराही आधार न घेता, केवळ स्वतःच्या हातांच्या कौशल्याने आणि शुद्ध काळ्या मातीने अत्यंत रेखीव व जिवंत गणेशमूर्ती साकारत आहे.
आज संपूर्ण जग हवामान बदल आणि वाढत्या प्रदूषणाच्या भयावह संकटाशी झुंजत आहे. अशा गंभीर परिस्थितीत आपण ज्या देवतेचा उत्सव साजरा करतो, त्या देवाची मूर्ती किंवा पूजा साहित्य निसर्गाला घातक ठरणार नाही, याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घ्यायला हवी. शाडू आणि काळ्या मातीच्या मूर्तींची स्थापना करणे हा केवळ एक पर्याय नसून निसर्गरक्षणाचा दृढ संकल्प आहे. मातीची मूर्ती घडवून निसर्गाचा समतोल राखणे हीच आमची खरी ईश्वरसेवा आहे.
— हरिभाऊ राजाराम राऊत (ज्येष्ठ मूर्तिकार, देऊळगाव माळी)

