अवकाळी पावसाने बीजोत्पादनाचे प्लॉटस जमीनदोस्त, शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान

editor 1 Min Read
1 Min Read

– भुमराळासह अनेक गावातील शेतकरी उद््ध्वस्त

चिखली/मेरा बुद्रूक (ब्रेकिंग महाराष्ट्र) – बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकर, चिखली, देऊळगावराजा, सिंदखडेराजा या तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. लोणार तालुक्यातील भुमराळा येथील ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी बीजोत्पादन सीडस घेतात. त्या शेतकर्‍यांना तर या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका बसला आहे.

४ सप्टेंबररोजी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ४ सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक गारांसह वादळी पाऊस झाला. तीन महिन्यांपासून रात्र आणी दिवस आपल्या मुलासारखे प्लॉटचे संगोपन या शेतकर्‍यांनी केले होते. रोही, हरणांच्या त्रासातून वाचविलेले पीक एका तासात जमीनदोस्त झाले, आणि शेतकर्‍यांच्या कष्टांवर पाणी फेरले गेले. ज्या शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने गजानन मोरे, रामेश्वर मोरे, संतोष मापारी, केशव मोरे, अशोक मोरे, भगवान मोरे, संदीप मोरे, मधुकर मोरे, अक्षय मोरे यासह अनेक शेतकर्‍यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. संबंधित खात्याने याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी वरील शेतकरी मागणी करत आहे.

Share This Article
Exit mobile version