मेहकर (प्रतिनिधी) – साखरखेर्डा नवीन पुलाचे काम रेंगाळल्याने या पुलाला पर्यायी मार्ग निर्माण करण्यात आला आहे. परंतु, हा अरुंद रस्ता रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पाहून गेला असून, तब्बल ३५ गावांचा संपर्क तुटला आहे. कसा तरी रस्ता सुरु करण्याच्या नादात नदीतील काळी माती आणून टाकण्यात आली. त्यात दुचाक्या व वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे अनेक शेतकर्यांचा खते, बीबियाणे आदी शेतमाल नदीच्या काठावर अडकून पडलेला असून, जडवाहतूक ठप्प आहे.
साखरखेर्डा येथील नवीन पुलाच्या बांधकामाशेजारी असलेला पर्यायी मार्ग अरुंद आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तो पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे साखरखेर्डा गाव व जवळपास तीस ते पस्तीस खेडे गावांचा संपर्क तुटलेला आहे. रात्री दोन वाजेच्या दरम्यान वाहून गेलेल्या या रस्त्यावर थातुरमातुर नदी मधीलच काळी माती टाकून हा रस्ता कसा तरी तयार केला. व तो पायी चालणारे व दुचाकीस्वार यांच्यासाठी खुला करण्यात आला. सद्या परत एकदा थोडाफार जरी पाऊस पडला तर परत टाकलेली माती वाहून जाण्याची शक्यता आहे. सध्या यावरून जड वाहतूक पूर्णपणे बंद आहे. आता या भागात पेरणीचे दिवस सुरु आहे. या दिवसांमध्ये अनेक शेतकरी खामगाव येथून बियाणे आणण्याकरिता काल गेले होते. रस्ता वाहून गेल्याने त्यांची वाहने नदीच्या काठावर अडकून पडलेली आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पर्यायी मार्ग तातडीने सुरु करण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.

