शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त धाकटी अलंकापुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र भगवानगडावर यंदा भक्तांचा अक्षरशः महासागर उसळला. पहाटेपासूनच लाखो भाविकांनी विजयी पांडुरंग व वै. संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गडाकडे धाव घेतली. दिवसभर संपूर्ण गड परिसर “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामगजराने दुमदुमून गेला. प्रशासनाच्या अंदाजानुसार सुमारे पाच लाखांहून अधिक भाविकांनी भगवानगडावर हजेरी लावत यंदाची विक्रमी गर्दी नोंदविली.
वारकरी संप्रदायासाठी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरला प्रत्यक्ष जाऊ न शकणारे लाखो भाविक दरवर्षी भगवानगडावर येऊन विजयी पांडुरंग आणि वै. संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतात. यंदाही महाराष्ट्रासह विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धाभावाने दर्शन घेत हरिनामाच्या गजरात सहभाग नोंदविला. यावेळी भारजवाडी ग्रामस्थांच्या वतीने तब्बल शंभर क्विंटल साबुदाणा फराळाचे अन्नदान करण्यात आले. हजारो स्वयंसेवकांच्या सहकार्याने लाखो भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने फराळाचे वाटप करण्यात आले. अन्नदानाच्या या सेवाकार्याचे भाविकांनी कौतुक केले. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनासह घोगस पारगाव, माळेगाव, एकनाथवाडी आणि भालगाव येथील युवकांनी दर्शन रांगा, वाहतूक व वाहनतळ व्यवस्थेची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली. त्यांच्या नियोजनामुळे एवढ्या मोठ्या गर्दीतही दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडली.
आषाढी एकादशीनिमित्त भगवानगडावर अवतरलेला भक्तांचा जनसागर, अखंड हरिनामाचा गजर आणि अन्नदानाची अखंड परंपरा यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भक्ती, सेवा आणि समर्पणाचा संगम अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.