-निकृष्ट ‘अहमदाबादी बर्फी’पासून पेढे तयार करून ग्राहकांची फसवणूक; विनायक सरनाईक यांची जिल्हाधिकारी व अन्न-औषध प्रशासनाकडे धडक
चिखली (अंकुश पाटील) : चिखली शहरासह बुलढाणा जिल्ह्यातील विविध स्वीटमार्ट्समध्ये निकृष्ट दर्जाची मिठाई विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अत्यंत स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या ‘अहमदाबादी बर्फी’पासून तयार केलेले पेढे शुद्ध ‘मलाई पेढा’ असल्याचे भासवून ग्राहकांना चढ्या दराने विकले जात असल्याचा आरोप विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्तांकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनाही ई-मेलद्वारे करण्यात आली असून, राज्यभर सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी मोहिमेअंतर्गत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. भेसळयुक्त मिठाई आणि बनावट खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आता या गंभीर प्रकरणात प्रशासन प्रत्यक्षात कोणती कारवाई करते, याकडे चिखलीसह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

