आळंदीत नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागातील सुमारे ३०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग; आपत्तीपूर्व तयारी ते पुनर्वसनापर्यंत सखोल मार्गदर्शन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये आळंदी नगर परिषदेच्या वतीने फ्रूटवाले धर्मशाळा, आळंदी येथे छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागातील नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणात दोन्ही विभागांतील विविध नगरपरिषदांमधील सुमारे ३०० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहायुक्त देवीदास टेकाडे, पुणे विभागाचे सहायुक्त चंद्रकांत खोसे, पुणे जिल्हा नगरपालिका प्रशासन विभागाचे सहायुक्त मच्छिंद्र घोलप, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर, नगरसेविका वैजंताताई उमरगेकर, नगरसेवक तसेच विविध नगरपरिषदांचे अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी ऑर्गनायझेशन फॉर डिझास्टर मॅनेजर्स (ODM) संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनोद भारद्वाज आणि त्यांच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या पथकाने मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे कायदेशीर स्वरूप, आपत्तीपूर्व तयारी, आपत्कालीन प्रतिसाद, शोध व बचावकार्य, विविध विभागांतील समन्वय, आपत्तीपश्चात पुनर्वसन, आपत्कालीन संप्रेषण व्यवस्था तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील शहरी भागात सन २०२४ ते २०२६ या कालावधीत घडलेल्या विविध आपत्तींचे विश्लेषण करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. शहरी पूर, नदीला आलेले पूर, दरडी कोसळणे, पूल व इतर संरचनात्मक अपयश, जाहिरात फलक कोसळणे, जीर्ण व धोकादायक इमारतींचे अपघात, वृक्ष पडणे, निवासी, व्यावसायिक व औद्योगिक आगी, कचरा डेपो दुर्घटना, पुराच्या काळातील विद्युत अपघात, रस्ते खचणे, वादळी वाऱ्यांमुळे होणारे नुकसान, संरक्षण भिंती कोसळणे, गॅस गळती, रासायनिक दुर्घटना, जलनिस्सारण व्यवस्था निकामी होणे, विद्युत पायाभूत सुविधांचे नुकसान, अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्थेवरील परिणाम तसेच पुरानंतर उद्भवणारे जलजन्य व डासजन्य साथीचे रोग यांसारख्या विषयांवर प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे, आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका, नागरिकांचा सहभाग, आपत्ती जोखीम कमी करणे (Disaster Risk Reduction), हवामान बदलामुळे वाढणारी शहरी आपत्तीची तीव्रता तसेच आपत्ती प्रतिरोधक (Resilient) शहरे उभारण्याच्या संकल्पनेवरही सखोल चर्चा करण्यात आली. मान्यवरांनी आपल्या मनोगतात आपत्ती व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याची सामूहिक प्रक्रिया असल्याचे सांगितले. प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत, बचावकार्य आणि समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि व्यवस्थापन आळंदी नगर परिषदेने उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी तसेच आयोजन समितीने मोलाचे योगदान दिले. उपस्थित सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि प्रत्यक्ष कामकाजासाठी मार्गदर्शक ठरल्याची भावना व्यक्त केली.

Share This Article
Exit mobile version