-पीक कर्ज नाही, बोगस औषधांचा मारा; देऊळगाव राजातील शेतकरी संकटात
-“कृषी विभाग जागा होणार कधी?” शेतकऱ्यांचा थेट सवाल; पाच दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
देऊळगाव राजा (सुरेश हुसे) : उशिरा आलेला पाऊस, वेळेत न मिळालेले पीक कर्ज, सावकारांकडून व्याजाने घेतलेले पैसे आणि त्यातच बोगस बियाणे, निकृष्ट खते तसेच बनावट कीटकनाशकांच्या वाढत्या विक्रीमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी १७ जुलै रोजी निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
आधीच बुलढाणा जिल्हा शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमुळे संवेदनशील मानला जात असताना, पीक कर्जातील विलंब, वाढते उत्पादन खर्च आणि निकृष्ट कृषी निविष्ठांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच तीव्र झाली असल्याची भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून देण्याबरोबरच बोगस कंपन्या व संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच येत्या पाच दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर मधुकर उत्तमराव शिंगणे, शेख जुल्फेकार शेख यासीन, पुरुषोत्तम नारायण शिंगणे, वसंतराव हिम्मतराव पाटील, दत्तात्रय प्रताप इंगळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

