जिल्ह्यातील ‘ब’ वर्गातील ९ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-देऊळगाव साखरशा, लोणी गवळीसह मेहकर तालुक्यातील ८ संस्थांचा समावेश; १६ ऑगस्टला मतदान

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ‘ब’ वर्गातील नऊ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा, लोणी गवळीसह आठ सहकारी संस्थांचा समावेश आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणेचे सचिव अशोक गाडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, ही माहिती मेहकरचे सहाय्यक निबंधक अविनाश सांगळे यांनी दिली.

महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम, २०१४ मधील नियम १८ नुसार या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी संबंधित संस्थांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. चिखली तालुका शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिखली या संस्थेच्या निवडणुकीसाठी आर. ए. डाहाके (मुख्य लिपिक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चिखली) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मेहकर तालुक्यातील गजानन महाराज शेड्युल कास्ट इंडस्ट्रीज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सोनाटी आणि ग्रामसेवा सहकारी सोसायटी, मोळा यांच्यासाठी ए. बी. सांगळे (सहाय्यक निबंधक, मेहकर), लोणी गवळी ग्रामसेवा सहकारी संस्थेसाठी पी. बी. कस्तुरे (लेखापरीक्षक श्रेणी-२), बेलगाव ग्रामसेवा सहकारी सोसायटीसाठी एस. व्ही. जाधव (लेखापरीक्षक श्रेणी-२), देऊळगाव साखरशा व हिवरा खुर्द ग्रामसेवा सहकारी सोसायटींसाठी कु. पी. बी. भगत (मुख्य लिपिक), पांगरखेड ग्रामसेवा सहकारी संस्थेसाठी एम. के. कंधारकर (कनिष्ठ लिपिक) तसेच वडगाव माळी ग्रामसेवा सहकारी संस्थेसाठी एस. यू. जाधव (कनिष्ठ लिपिक) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, अनेक वर्षांनंतर या सहकारी संस्थांच्या निवडणुका होत असल्या तरी सध्या या संस्थांना कर्जवाटपासह काही महत्त्वाचे अधिकार नसल्याने निवडणुका अविरोध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. १६ जुलै रोजी अर्जांची छाननी होणार असून १७ जुलै रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ३ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून ४ ऑगस्ट रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. १६ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून मतदानानंतर त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Share This Article
Exit mobile version