‘भक्ती व ज्ञानाचे जिवंत प्रतीक’ ठरले ‘ज्ञान-कर्म-भक्तियोग’ महाप्रवेशद्वार

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-महाप्रवेशद्वाराच्या उभारणीचा इतिहास उलगडणाऱ्या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन; देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांचे प्रतिपादन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : देहू येथील ‘ज्ञान-कर्म-भक्तियोग’ महाप्रवेशद्वार ही केवळ एक वास्तू नसून भक्ती, ज्ञान आणि संतपरंपरेचे जिवंत प्रतीक आहे. विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी श्रीक्षेत्र आळंदी-देहू विकास समितीच्या माध्यमातून उभारलेल्या या महाप्रवेशद्वाराने जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यात मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन संत श्री तुकाराम महाराजांचे वंशज व देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांनी केले.

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे औचित्य साधून विश्वशांती केंद्र आळंदी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तत्त्वज्ञ जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज ज्ञान-कर्म-भक्तियोग महाप्रवेशद्वार’ या वास्तूच्या रौप्यमहोत्सवी (२५ व्या) वर्षानिमित्त महाप्रवेशद्वाराच्या उभारणीचा इतिहास आणि समितीच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन देहू येथे करण्यात आले. यावेळी विश्वशांती दिंडीच्या (आळंदी ते पंढरपूर) संस्थापक अध्यक्षा ह.भ.प. उषा विश्वनाथ कराड आणि क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी देहू नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्षा प्रियांका मोरे, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक तथा एमआयटीच्या विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे, ह.भ.प. नितीन महाराज मोरे, देहू देवस्थानचे माजी विश्वस्त बाळासाहेब मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळोखे, नंदकुमार काळे, विठ्ठलराव काळोखे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे, माजी सरपंच अशोक मोरे, ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर, प्रा. विकास कंद तसेच देहू नगरपरिषदेचे आजी-माजी सदस्य, ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह.भ.प. बापूसाहेब मोरे म्हणाले, “२५ वर्षांपूर्वी जगद्गुरू तुकोबारायांच्या नावाला साजेसे भव्य महाप्रवेशद्वार उभे राहिले. या प्रवेशद्वारामुळे देहूच्या वैभवात मोठी भर पडली. आज या संपूर्ण प्रवासाचा इतिहास पुस्तिकेच्या माध्यमातून समाजासमोर येत असून, ही पुस्तिका भावी पिढीला संत विचारांची आणि तीर्थक्षेत्राच्या विकासाची प्रेरणा देणारी ठरेल.” क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी सांगितले की, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीने गेल्या अनेक वर्षांत देहूच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा इतिहास या पुस्तिकेतून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. प्रा. स्वाती कराड-चाटे म्हणाल्या, “विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या महाप्रवेशद्वाराला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या वास्तूच्या उभारणीमागील इतिहास, परिश्रम आणि समितीच्या कार्याचा ठसा भावी पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे संतसेवा आणि विश्वशांतीचे कार्य भविष्यातही अविरत सुरू ठेवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब काळोखे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले, तर आभार उमेश टीजगे यांनी मानले.

Share This Article
Exit mobile version