-शेलगाव जहागीर येथील मारहाण प्रकरणी भीमसैनिकांचा इशारा; पीडितेला न्याय देण्याची मागणी
चिखली (महिंद्रा हिवाळे) : तालुक्यातील शेलगाव जहागीर येथील सौ. उषाताई रमेश साळवे यांना जमिनीच्या वादातून गंभीर मारहाण झाल्याच्या प्रकरणात संबंधित आरोपींना २४ तासांच्या आत अटक करावी, अन्यथा पोलीस ठाण्यावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिलीपभाई खरात यांनी प्रशासनाला दिला.
या प्रकरणात पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाची भेट घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील खुनाच्या प्रयत्नासंदर्भातील कलमान्वये गुन्हा दाखल करावा, पीडित महिलेची जमीन तिला परत मिळवून देऊन तिला तातडीने न्याय द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रशांत डोंगरदिवे यांना दूरध्वनीवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तात्काळ कारवाई करून अटक करावी, अशीही मागणी करण्यात आली.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्रातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संबंधित पोलीस ठाण्यावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येईल. त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिलीपभाई खरात यांनी दिला. यावेळी प्रकाशभाई धुडळे, सिद्धांतभाई वानखेडे, प्रा. पठाण सर, दिलीप काकडे सर, वंदनाताई वाघ, हिम्मतराव जाधव, प्रशांत डोंगरदिवे, संदीपभाई गवई, प्रकाश पाटील, अशोक खरात, सचिन भाऊ, परमेश्वर साळवे,
सलीमभाई पठाण, राणा मोरे, आश्विन लहाने यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.

