साखरखेर्डा नगरीत फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य स्वागत; भाविकांकडून चहा, पाणी व भोजनाची सेवा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : श्रीक्षेत्र वरोडी येथून पंढरपूरकडे निघालेल्या परमहंस श्री तेजस्वी महाराज वारकरी पायी दिंडीचे सोमवारी (दि. ७ जुलै) साखरखेर्डा येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

यावेळी साखरखेर्डा येथील होळकर भजनी मंडळ, संत सावता माळी भजनी मंडळ तसेच महिला, पुरुष आणि बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेत दिंडीत सहभाग नोंदविला. ही पायी वारकरी दिंडी दर कोसावर मुक्काम करत १८ दिवसांचा प्रवास पूर्ण करून शुक्रवार, २४ जुलै रोजी आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर येथे दाखल होणार आहे. दिंडीत मोठ्या संख्येने महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले असून मुक्कामाच्या ठिकाणी दररोज सायंकाळी श्री हरिपाठ व आरती, रात्री हरिकीर्तन आणि पहाटे काकडा भजनाचा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे. वारकऱ्यांच्या भोजनाची तसेच आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक साहित्य व सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. साखरखेर्डा ग्रामस्थांनी दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली होती. त्यानंतर दिंडीने शेंदूरजनकडे प्रस्थान केले असून सोमवारी रात्रीचा मुक्काम शेंदूरजन येथे होणार आहे.

