गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; ‘लोकशाहीचे वास्तव’ या विषयावर व्याख्यान
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जन्मोत्सव वर्ष आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बुलढाणा येथे मराठा सेवा संघ जिल्हा बुलढाणा (दक्षिण) च्या वतीने प्रबोधनात्मक व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. “शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार आणि आजचे वास्तव” या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी महापुरुषांचे विचार अंगीकारणे हीच आजच्या काळाची खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले.
प्रमुख वक्ते धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी आपल्या व्याख्यानातून आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर अतिशय मार्मिक व रोखठोक भाष्य केले. महापुरुषांनी दिलेला समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश आजच्या तरुणाईने समजून घेणे गरजेचे असून, सोशल मीडियाच्या काळात वास्तवाचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष (बुलढाणा दक्षिण) शिवश्री इंजिनियर रविकांत काळवाघे यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाची ही चळवळ अशीच पुढे सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ सृष्टी व्यवस्थापन समितीचे कोषाध्यक्ष शिवश्री अभय पाटील, इतिहास अभ्यास कक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री खांडवे सर आणि प्रमोद टाले यांनी विशेष परिश्रम घेतले. शरद कला महाविद्यालयाचे प्राचार्य शिवश्री विष्णुपंत पाटील यांनी या कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक शिवश्री प्रवीण मिसाळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा सचिव शिवश्री विलासराव तेजनकर यांनी मानले. या सोहळ्याला जिल्ह्यातील नागरिक, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

