-लाखो रुपयांचे नुकसान; शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी
चिखली (अंकुश पाटील) : तालुक्यातील भरोसा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील शेडनेट गृहांचे अलीकडील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेडनेटमधील पिकांसाठी तयार करण्यात आलेले बेडही उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने शेडनेटची दुरुस्ती केली असली तरी अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना नुकसान भरून काढणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, कृषी विभागाकडून दुरुस्तीसाठी मदत मिळण्याऐवजी नोटिसा देऊन मानसिक त्रास दिला जात आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शेडनेट गृहांचे नुकसान झाल्याने शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी अपेक्षाही शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

