धाड परिसरातील यशवंत युवकांचा आमदार श्वेता महाले-पाटील यांच्या हस्ते गौरव

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-देशसेवा, कर्तृत्व आणि जिद्दीचा प्रेरणादायी सन्मान सोहळा उत्साहात

चिखली (अंकुश पाटील) : देशसेवेचा अभिमान आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा प्रेरणादायी सोहळा धाड येथे उत्साहात पार पडला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारतीय सैन्यदल, पोलीस तसेच विविध शासकीय सेवांमध्ये नव्याने निवड झालेल्या धाड परिसरातील युवक-युवतींचा आणि त्यांच्या पालकांचा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले-पाटील म्हणाल्या की, देशसेवेची भावना, कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने शासकीय सेवांमध्ये यश संपादन करत आहेत. या यशामागे राज्यातील पारदर्शक भरती प्रक्रिया आणि गुणवत्तेला दिलेले प्राधान्य हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध विभागांतील भरती प्रक्रियांना गती देण्यात आली असून, तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांना पारदर्शक पद्धतीने संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील होतकरू युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव तथा चिखली विधानसभा मतदारसंघाशी जिव्हाळ्याचे नाते असलेले विद्याधर महाले यांनी मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार विविध ठिकाणी अभ्यासिकांची उभारणी आणि शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि प्रेरणादायी मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून अनेक युवकांना शासकीय सेवेत यश मिळविण्यास त्याचा लाभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने युवकांना रोजगार, कौशल्य विकास, पारदर्शक प्रशासन आणि डिजिटल प्रणालीद्वारे अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. गुणवत्तेच्या आधारे संधी मिळण्याचा विश्वास वाढल्याने ग्रामीण भागातील युवक देशसेवेची प्रेरणा घेऊन मोठ्या संख्येने सैन्य, पोलीस आणि विविध शासकीय सेवांमध्ये प्रवेश करत आहेत.

या प्रेरणादायी सोहळ्यात यशस्वी युवकांचा गौरव करून समाजासमोर एक सकारात्मक आदर्श उभा करण्यात आला. राष्ट्रसेवा आणि समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या या युवकांच्या यशामध्ये त्यांच्या पालकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत आमदार श्वेता महाले-पाटील यांनी व्यक्त केले. या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आमदार श्वेता महाले-पाटील यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे अभिनंदन केले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील जाधव, डॉ. तेजराव नरवाडे, भाजप नेते सुनील देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे, सरपंच सावित्रीबाई बोर्डे, विष्णू वाघ, प्रवीण वाघ, विष्णू उगले, संदीप उगले, शहराध्यक्ष अनिल कुटे, सरपंच अनिल फेपाळे, दिगंबर जाधव, गणेश साखरे, प्रकाश राऊत तसेच आयोजक किरण सरोदे, योगेश राजपूत, विशाल विसपुते, गणेश बाजी आणि युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रदीप टाकसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share This Article
Exit mobile version