गावागावांत वाढतेय ‘आम्ही लग्नाळू’ पिढी! चिखली तालुक्यात शेतकरी तरुणांचे विवाह जुळणे बनले आव्हान!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

बदलत्या अपेक्षा, शेतीचे तुकडीकरण अन् घटत्या जन्मदरामुळे ग्रामीण भागात नवी सामाजिक समस्या!

चिखली (अंकुश पाटील) : “मुलगा तिशीत गेला, पण लग्न काही जुळेना… पाच वर्षांपासून स्थळे बघतोय. मुलगी नोकरीवाला मुलगा मागतेय, आमचा मुलगा शेती करतोय…” अशा हताश चर्चा आज चिखली तालुक्यातील अनेक गावांच्या वस्त्यांवर आणि ओट्यांवर ऐकायला मिळत आहेत. एकेकाळी ज्या गावांमध्ये लग्नसराईत बँडबाजा आणि वऱ्हाडी मंडळींची लगबग असायची, तिथे आता विवाहयोग्य वय ओलांडलेल्या मुलांची संख्या चिंताजनक वाढली आहे. शेतीचे तुकडीकरण, बेरोजगारी, व्यसनाधीनता, मुलींच्या बदलत्या अपेक्षा आणि मुलींची कमी संख्या (लिंगगुणोत्तर) यांमुळे ग्रामीण भागात एक नवी सामाजिक समस्या आकारास येत असून, गावागावांतील ही ‘आम्ही लग्नाळू’ पिढी आता संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय बनू लागली आहे.

तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये फेरफटका मारल्यास प्रत्येक गावात दोन-चार नव्हे, तर अनेक विवाहयोग्य तरुण विवाहाच्या प्रतीक्षेत सहज दिसून येतात. काही तरुणांचे वय २७ ते २८ वर्षे आहे, काही पन्नाशीच्या उंबरठ्यावर म्हणजेच ३५ च्या घरात आहेत, तर काही चाळिशीकडे वाटचाल करत आहेत. घरात आई-वडील, शेती, जनावरे, स्वतःचे पक्के घर… सर्वकाही सुबत्ता आहे, मात्र संसाराची गाडी सुरू होण्यास मुहूर्त सापडत नाहीये. अनेक तरुणांच्या मोबाईलमध्ये विविध विवाह मंडळांच्या नोंदी आहेत, काही जण नातेवाईकांच्या माध्यमातून तर काही जण तालुक्याबाहेर व जिल्ह्याबाहेर प्रयत्न करत आहेत; तरीही प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने लग्न ठरता ठरता मोडत आहे.

आज ग्रामीण भागातील विवाह व्यवस्थेवर सर्वाधिक ऐकायला मिळणारे वाक्य म्हणजे, ‘मुलगा चांगला आहे, पण नोकरी नाही.’ पूर्वी विवाह जुळवताना शेती, कुटुंबाची प्रतिष्ठा आणि मुलाचा स्वभाव यांना सर्वोच्च महत्त्व असायचे. मात्र, आता सरकारी नोकरी, बँक बॅलन्स, शहरातील स्वतःचे घर आणि निश्चित मासिक उत्पन्न या गोष्टी विवाहासाठी निर्णायक ठरत आहेत. दोन ते पाच एकर शेती असलेले तरुण केवळ ‘नोकरी नाही’ या एकाच कारणामुळे विवाह स्पर्धेत मागे पडत आहेत. मुलींचे पालक भविष्यातील सुरक्षिततेचा विचार करत असले, तरी त्यांच्या या अवास्तव अटींमुळे ग्रामीण भागातील हजारो तरुण विवाहापासून वंचित राहत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

गेल्या दशकात ग्रामीण समाजात मोठे सामाजिक बदल झाले आहेत. शिक्षणामुळे मुली अधिक जागरूक झाल्या असून स्वतःचे करिअर, आर्थिक सुरक्षितता आणि चांगल्या जीवनशैलीबाबत त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. “शहरातच राहायचे आहे, शेती करायची नाही, स्वतंत्र घर पाहिजे आणि मुलगा नोकरीवालाच हवा,” अशा अपेक्षा वाढताना दिसत आहेत. दुसरीकडे, ग्रामीण भागातील वास्तव मात्र अजूनही शेती, निसर्गावर आधारित हंगामी उत्पन्न आणि पारंपरिक जीवनशैलीभोवतीच फिरते आहे. परिणामी, अपेक्षा आणि वास्तव याच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे.

व्यसनामुळे मोडतात अनेक प्रस्ताव

विवाह जुळविताना सध्या मुलांच्या सवयींची गुप्तपणे चोख चौकशी केली जाते. मुलाला दारू, गुटखा, तंबाखू किंवा इतर कोणतेही व्यसन असल्याचे समजताच अनेक चांगले प्रस्ताव जागेवरच नाकारले जातात. ग्रामीण भागातील काही तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढल्याने त्याचा थेट फटका त्यांच्या विवाहावर होत असल्याचे मध्यस्थ (लग्नाळूंचे मध्यस्थी) सांगतात. त्यामुळे व्यसन ही केवळ आरोग्याची नव्हे, तर एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे.

शेतीचे तुकडे अन् घटलेली आर्थिक पत

  • जमिनीचे विभाजन: आजोबांच्या काळात असलेली २० ते २५ एकर शेती पुढच्या पिढ्यांमध्ये विभागली गेल्याने अनेक कुटुंबांत आता अवघी दोन ते चार एकर जमीन उरली आहे.
  • उत्पन्नाची अनिश्चितता: निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस अन् दुष्काळामुळे शेती उत्पन्नाची शाश्वती राहिलेली नाही.
  • उत्पादन खर्च अधिक: शेतीमालाला हमीभाव नसणे आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत नफा कमी असल्याने ‘शेती’ हा विवाहाच्या बाजारात आता आकर्षक पर्याय राहिलेला नाही.

स्थळे येतात, चर्चा होतात, चहा-पोहे होतात, मात्र अंतिम निर्णय ‘नाही’ असाच येतो. शेती क्षेत्रातील अनिश्चितता, वाढती बेरोजगारी, मुलींचा घटलेला जन्मदर आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षा या दुष्टचक्रात ग्रामीण तरुण अडकला आहे. ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केवळ मुलींच्या पालकांनीच नव्हे, तर संपूर्ण समाजाने शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि विवाहविषयक मानसिकतेत सकारात्मक बदल करणे ही काळाची गरज बनली आहे.

Share This Article
Exit mobile version