– आता शांत बसणार नाही! मागण्या मान्य न झाल्यास थेट बैलगाडी मोर्चा- विनायक सरनाईक यांचा इशारा
– शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; चोख बंदोबस्तातही घुमल्या कर्जमुक्तीच्या घोषणा
– पाच दिवसांपासून अन्नत्याग सुरूच, पण प्रशासनाला पाझर फुटेना!
चिखली (अंकुश पाटील) : हक्काचा पीक विमा, संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस उजाडला, तरीही कुंभकर्णी झोपेत डाराडूर झोपलेल्या सरकारला अद्याप जाग आलेली नाही. सरकारच्या या निर्दयी आणि शेतकरीविरोधी धोरणाविरोधात आता ग्रामीण भागातील बळीराजा पेटून उठला असून, जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा वणवा अधिक तीव्र झाला आहे. याच संतापाचा मोठा उद्रेक आज (१९ जून) सकाळी १० वाजता चिखली तालुक्यातील मेरा चौकी येथे पाहायला मिळाला. शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन करत महामार्गाची कोंडी केली आणि सरकारला त्याची जागा दाखवून दिली.
आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, आंदोलनाचा वाढता जोर आणि शेतकऱ्यांचा आक्रोश रोखणे पोलिसांना कठीण झाले होते. शेवटी आंदोलन चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी नेहमीप्रमाणे बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्तात शेतकरी नेते विनायक सरनाईक, भानुदास घूबे, गणेश थुट्टे, भागवत थुट्टे, विनोद थुट्टे, विशाल थुट्टे, सुनील खेडेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना डांबून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असला, तरी ग्रामीण भागातील संतापाची ही ठिणगी आता संपूर्ण राज्यात वणवा पेटवणार, हे स्पष्ट दिसत आहे.

