ऋषी नागार्जुनांच्या वारशावर घाला? नागलवाडीतील पुरातन अवशेष नष्ट करण्याचा प्रयत्न उघड

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-काशी केदारेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक वारसा धोक्यात; वन विभागाची तातडीची कारवाई

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील काशी केदारेश्वर मंदिर परिसरातील ऋषी नागार्जुन गुहा, पुरातन शिवपिंड, नंदी आणि इतर ऐतिहासिक अवशेषांच्या अस्तित्वावरच संकट ओढवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या परिसरातील पुरातन वारसा नष्ट करून बेकायदेशीर बांधकाम उभारण्याचा प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थ, भाविक आणि इतिहासप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नागलवाडी, गोळेगाव आणि परिसरातील डोंगरदऱ्यांच्या मध्यभागी वसलेले काशी केदारेश्वर मंदिर हे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ मानले जाते. घनदाट जंगल, डोंगरकपारी आणि नैसर्गिक वातावरणात वसलेल्या या परिसरात अनेक ऋषी-मुनी, संत-महंत यांचे वास्तव्य असल्याच्या आख्यायिका आजही सांगितल्या जातात. स्थानिक परंपरेनुसार प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास काळात या परिसरात वास्तव्य केल्याचेही सांगितले जाते. यासंदर्भातील काही अवशेष आजही परिसरात आढळून येत असल्याचा दावा ग्रामस्थ करतात. या भागाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ऋषी नागार्जुन यांच्याशी जोडला गेलेला इतिहास. स्थानिकांच्या मते, प्राचीन काळात ऋषी नागार्जुन यांनी या डोंगररांगांमध्ये दीर्घकाळ वास्तव्य करून वनस्पतीआधारित औषधनिर्मिती, रसायनशास्त्र आणि विविध संशोधन कार्य केले होते. त्यांच्या नावावरूनच या परिसराला “नागलवाडी” हे नाव पडल्याची आख्यायिका पिढ्यान्पिढ्या सांगितली जाते. त्यामुळे हा परिसर केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानला जातो. मात्र, अलीकडेच या परिसरात पुरातन अवशेषांच्या जवळ बेकायदेशीर बांधकाम सुरू करण्यात आल्याचे समोर आले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ऋषी नागार्जुन गुहेजवळ असलेल्या पुरातन महादेव मंदिरातील शिवपिंड, ऐतिहासिक दगडी अवशेष आणि सुमारे एक टन वजनाचा भग्नावस्थेतील नंदी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात असलेला हा नंदी आता गायब झाल्याचेही निदर्शनास आले असून त्यामुळे संशय अधिकच बळावला आहे.

इतिहासाच्या खुणा जपणाऱ्या या स्थळावर नव्याने बांधकाम करून मूळ पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच काशी केदारेश्वर देवस्थानचे प्रमुख ह.भ.प. बाबागिरी महाराज, ग्रामस्थ, भाविक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. तक्रारीची गंभीर दखल घेत वन विभागाने त्वरित कारवाई केली. वनरक्षक विजय पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेले बांधकाम थांबवले तसेच बांधकामासाठी आणण्यात आलेले साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे पुरातन स्थळावरील संभाव्य नुकसान टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मात्र, या प्रकारामागे नेमके कोण आहे, बांधकामाची परवानगी कुणी दिली आणि ऐतिहासिक अवशेषांचे नुकसान कितपत झाले याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. ग्रामस्थांच्या मते, नागलवाडी परिसरातील ऋषी नागार्जुन गुहा, काशी केदारेश्वर मंदिर, शिवपिंड, नंदी आणि इतर अवशेषांचे शास्त्रोक्त सर्वेक्षण करून त्यांची ऐतिहासिक नोंद करणे आवश्यक आहे. पुरातत्त्व विभागाने या स्थळाची तातडीने पाहणी करून संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे नागलवाडीतील ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात या परिसरातील अमूल्य ऐतिहासिक ठेवा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


चौकट

एक टन वजनाचा नंदी गायब!

नागलवाडी येथील प्राचीन नागार्जुन गुहा परिसरातील सुमारे एक टन वजनाचा भग्नावस्थेतील दगडी नंदी रहस्यमयरीत्या गायब झाला आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या मंदिरातील महत्त्वाचा अवशेष नाहीसा झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, प्रकरणाची चौकशी करून नंदीचा शोध घेण्याची मागणी केली आहे. मंदिर परिसरातील पुरातन अवशेषांच्या सुरक्षेचाही प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.


चौकट

“हा परिसर वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने घटनास्थळी भेट देऊन बेकायदेशीर सुरू असलेले बांधकाम बंद करण्यात आले आहे.”

– विजय पालवे, वनरक्षक


चौकट

“ज्या ऋषींच्या नावावरून नागलवाडीची ओळख निर्माण झाली, त्या ऋषींच्या वारशाचे पुरावेच आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सुमारे एक टन वजनाचा नंदी गायब होतो आणि पुरातन अवशेषांच्या शेजारी बांधकाम सुरू होते, ही अत्यंत गंभीर बाब आहे.”

– बाळासाहेब ढाकणे, ग्रामस्थ

Share This Article
Exit mobile version