आळंदी माऊली मंदिरास राज्यपाल आर्लेकर यांची सदिच्छा भेट

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-चैतन्य दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात

आळंदी (अर्जुन मेदनकर) : केरळ आणि तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देत अधिक मासानिमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी श्रींची पूजा करून माऊलींच्या चरणी नतमस्तक होत कृपाशीर्वाद घेतला. या प्रसंगी पुणे प्रमुख जिल्हा व जिल्हा सत्र न्यायाधीश अरविंद पी. वानखेडे यांच्यासह आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील आणि ॲड. रोहिणी पवार यांच्या हस्ते राज्यपाल आर्लेकर यांचा श्री ज्ञानेश्वरी, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आळंदीचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, व्यवस्थापक माऊली वीर, माजी विश्वस्त डॉ. अभय टिळक, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, नगरसेवक आदित्य घुंडरे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, तसेच संत सोपानकाका संस्थान, सासवडचे त्रिगुण महाराज गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या हस्ते वारकरी शिल्प भेट देऊन समस्त आळंदी ग्रामस्थांच्या वतीने राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर व त्यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांच्या हस्ते चैतन्य फाउंडेशन, गोवा यांनी भारतीय कालगणनेनुसार तयार केलेली विशेष दिनदर्शिका माऊलींच्या चरणी अर्पण करण्यात आली. तसेच करंजा मंडपात या ‘चैतन्य दिनदर्शिके’चे प्रकाशन करण्यात आले. या भेटीदरम्यान सुरू असलेल्या अधिक मासाच्या धार्मिक व आध्यात्मिक पर्वाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. राज्यपालांच्या अचानक भेटीमुळे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे काही भाविक व व्यापाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. यावेळी बोलताना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी, “चैतन्य दिनदर्शिकेचे प्रकाशन पुढील वर्षीदेखील आळंदीतच व्हावे,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

Share This Article
Exit mobile version