अधिक मासातील गर्दीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने दुर्घटना; ७५ वर्षीय वृद्ध महिला गंभीर, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप
बीड / माजलगाव (अशोक इंगळे/वैभवी स्वामी) : अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची बोट गोदावरी नदीपात्रात उलटल्याने दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मास उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असतानाही सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीही एक बोट नदीत उलटल्याची घटना घडली होती. त्याआधी १९ मे रोजी एका तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता. या घटनांनंतरही प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली नसल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत आहे. बोटींसाठी जीवरक्षक जॅकेटची सक्ती, प्रवासी क्षमतेचे पालन आणि सुरक्षेचे नियम काटेकोरपणे राबविण्यात आले असते, तर ही दुर्घटना टळू शकली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.


