बुलडाणा जिल्ह्यात यंदा 7 लाख 34 हजार 700 हेक्टरवर पेरणी

editor 2 Min Read
2 Min Read

बुलडाणा (गणेश निकम )गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. कमी पाण्यात हमखास येणारे पिक म्हणून सोयाबीनला शेतकऱ्यांची चांगली पसंती देखील लाभत आहे. जिल्ह्यात यंदा ७,३४,७०० हेक्टर क्षेत्रावर पिक पेरणी जय्यत नियोजन कृषी विभागाने केले असून त्यापैकी तब्बल ३ लक्ष ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरा अपेक्षीत धरला आहे. त्यामुळे यंदाही जिल्ह्याचे महत्वाचे पिक सोयाबीनच ठरणार आहे.
जिल्ह्यात दोन वर्षापासून पाऊस दिलासादायक आहे. परंतु त्यापुर्वी तब्बल ४-५ वर्ष जेमतेम पावसाचे गेले. पावसाचा लहरीपणा या काळात अनुभवास मिळाला. या काळातही सोयाबीन पिक तग धरुन होते. दोन पाऊस कमी झाले तरी सोयाबीन येते हा अनुभव असल्याने जिल्ह्यातील शेतकरी अलीकडच्या काळात सोयाबीनकडे वळले आहे. मागील वर्षी तर भाव बरयापैकी व झडीत देखील आले. यामुळे शेतकरयांनी पहिली पसंती सोयाबीनला दर्शविली आहे. जिल्ह्यातील जवळ-जवळ साडे सात लक्ष हेक्टर पैकी अर्धे-अधिक क्षेत्र सोयाबीनचे असणार आहे. याच सोबत ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मूग, भुईमूग, तीळ, सुर्यफुल, ऊस, कापूस आदी पिके देखील घेतली जाणार आहेत.

सोयाबीननंतर दुसरे महत्वाचे व नगदी पिक म्हणून कपाशीकडे पाहिल्या जाते. जिल्ह्यात २ लाख ९५० हेक्टर क्षेत्रफळावर कपाशीचा पेरा होणार आहे. त्यात मोताळा तालुका आघाडीवर आहे. सोयाबीननंतर तुरीचे क्षेत्रही मोठे राहणार आहे. जिल्ह्यात ७६हजार हेक्टरवर तूर लागवड होत आहे. त्यात चिखली व मेहकर तालुका आघाडीवर आहे.

सोयाबीनलाच पसंती..
यावर्षी या पिकात फरबदल होईल, असे वाटत असतांना शेतकरयांचा कल पुन्हा सोयाबीनकडेच गेला आहे. प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पिकांना प्राधान्यक्रम असून मेहकर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधीक सोयाबीन मागील वर्षी पेरल्या गेली. तोच क्रम यावर्षी कायम असून येथे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा होईल. मेहकर पाठोपाठ चिखली आणि लोणार तालुक्याची पसंतीही सोयाबीनलाच राहणार आहे.

घरातील बियाणे वापरा..
सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. शेतकरयांनी घरातील सोयाबीन बियाणाची उगवणूक क्षमता काढावी. ७० टक्के उगवणूक क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी योग्य ठरते. जिल्ह्यातील शेतकरयांनी घरातील बियाणांस प्राधान्य दिल्यास उत्पादन खर्च कमी होणार आहे.
– डॉ.सी.पी.जायभाये
वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ, पीकेव्ही

Share This Article
Exit mobile version