– तातडीने नुकसान भरपाई देण्याची नुकसानग्रस्त शेतकर्याची मागणी
– दीड-दोन लाखांचा खर्च करूनही टोमॅटो वाणाला फळेच लागली नाहीत!
चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील तेल्हारा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील शेतकरी मोतिराम कुटे व रमेश कुटे यांनी सिजेंटा कंपनीच्या टोमॅटो वाणाची लागवड केली होती. त्यावर प्रत्येकी दीड ते दोन लाखांचा खर्चही केला. परंतु, या वाणाला फळेच लागली नाहीत. त्यामुळे हे वाण वांझोटे निघाले असून, बियाण्यांतील भेसळही उघडकीस आली आहे. शेतकर्यांच्या तक्रारीवरून कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी टोमॅटो शेतीची पाहणी करून पंचनामा केला आहे. या शेतकर्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असून, कंपनीवर कार्यवाही करावी, अशी मागणीही कृषी अधिकार्यांकडे केली आहे.
या तक्रारीची तातडीने दखल घेत दि. २४/०८/२०२२ रोजी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. एस. तारू, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, कृषी अधिकारी संदीप सोनुने यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतकर्यांसह टोमॅटो पिकाची पाहणी केली. अधिकार्यांकडून रॅडम पध्दतीने झाडांच्या फळांची संख्या घेत, पंचनामादेखील करण्यात आला. यामध्ये झाडांना ७० ते ८० टक्के फळधारणा कमी असल्याचे व प्रत्यक्ष पाहणीमध्ये झाडांमधे २० ते ३०टक्के एवढी भेसळ असल्याचे समोर आले आहे. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, कृषी मंडळ अधिकारी डी. बी. गवते, कृषी सहाय्यक सौ वाकोडे, कंपनी प्रतिनिधी संजय सोळंकी, मोतीराम कुटे, रमेश कुटे, गजानन कुटे, गुलाबराव कुटे, एकनाथ कुटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कंपनी प्रतिनिधीने दिला झाडे उपटून फेकण्याचा उलटा सल्ला!
शेतकर्यांच्या तक्रारीनंतर कंपनीचे प्रतिनिधी यांनी रोपवाटिका मालकांच्या सांगण्यावरून शेताची पाहणी केला,r तर झाडांना फळधारणा कमी असल्याचे दिसून आले. यावर शेतकर्यांनी उपाय विचारला असता, पंचनामा होण्यापूर्वीच झाडे उपटून फेका, असा उलटा सल्ला या प्रतिनिधीने शेतकर्यांना दिला होता. म्हणजे, पुरावे नष्ट करण्याचे काम हा प्रतिनिधी करत होता, असे दिसून येत आहे.

