-पालखी सोहळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी; अपघात झाल्यास जबाबदार कोण? — अर्जुन मेदनकर
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील भागीरथी नाला मार्गाची दुरवस्था कायम असून या मार्गाची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली आहे. येत्या काळात संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा प्रस्थान करणार असल्याने या मार्गाचे महत्त्व अधिक वाढले आहे. मुख्य नगरप्रदक्षिणा मार्गावरील हा पर्यायी मार्ग असल्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भागीरथी नाला परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाला असून उताराचा असल्याने तो वाहनचालक आणि पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळा आणि पायी वारीचा विचार करता भागीरथी नाला तसेच दगडी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. “एखादा अपघात झाल्यानंतर प्रशासन जबाबदारी घेणार का?” असा सवालही अर्जुन मेदनकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बुरुड समाज धर्मशाळेचे बांधकाम सुरू असून संबंधित बांधकाम करणाऱ्या संस्थेला कामाबाबत आवश्यक सूचना देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. अन्यथा संबंधित संस्थेचा बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देऊन पालखी सोहळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

