पुणे /आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कोरोना महामारी संकट काळात कामावरून काढलेल्या सर्व संबंधित त्या २७० कामागारांना परत कामावर रुजू करून घेण्यासाठी तात्काळ आदेश काढण्याचे निर्देश कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी अप्पर कामगार आयुक्तांना दिले. यामुळे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतराव भोसले यांनी सुरू केलेल्या १३ दिवसांच्या उपोषणास यश आले आहे या निर्णयाचे कामगार वर्तुळातून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. कामगार नेते भोसले यांचे प्राणांतिक उपोषणास्त्र प्रभावी ठरले असून त्यांचे आंदोलन यशस्वी झाल्याने कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला. या शिवाय दरम्यान, केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या नवीन धोरणा संदर्भात अधिवेषणा नंतर चर्चा करू केली जाईल अशी ग्वाही कामगार मंत्री खाडे यांनी दिली असल्याचे कामगार नेते भोसले यांनी सांगितले.
बैठकी नंतर यशवंतराव भोसले म्हणाले, या बैठकीत कामगार मंत्री खाडे यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत. केंद्रीय कामगार कायद्या संदर्भात विधिमंडळ अधिवेशना नंतर चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे आम्ही सुरू केलेल्या लढ्याचे एक पर्व यशस्वी रित्या पार पडले असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस अप्पर कामगार आयुक्त अभय गीते, कामगार आयुक्त सुरेश जाधव यांचेसह कामगार, संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

