– पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; ‘शिवाजी कोण होता?’ वाचन आंदोलनाने राजकीय वातावरण तापले!
– संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात युवक काॅंग्रेसने आ. गायकवाड यांना दिले चोख प्रत्युत्तर!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – दिवंगत कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादाचे लोण आता रस्त्यावरील संघर्षापर्यंत पोहोचले आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या कथित शिवीगाळ प्रकरणाचे तीव्र पडसाद बुधवारी बुलढाण्यात उमटले. युवक काँग्रेसने पुकारलेल्या सामूहिक पुस्तक वाचन आंदोलनाला उत्तर देण्यासाठी आ. गायकवाड यांचे समर्थकही मैदानात उतरल्याने, शिवस्मारक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य राडा टळला.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह संदीपदादा शेळके, अनुराग भोयर, प्रवीण बिरादार, नितेश वानखेडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रशासकीय दडपशाही झुगारून हा वैचारिक लढा अधिक तीव्र करण्याचा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. तर दुसरीकडे, पुस्तकातील मजकुराला विरोध दर्शवत गायकवाड समर्थकांनीही आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.
“छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास मांडणाऱ्या पुस्तकांवर बंदी आणणे किंवा प्रकाशकांना महिलांविषयी अपशब्द वापरून धमकावणे ही लोकशाहीची हत्या आहे. दडपशाहीला न जुमानता आमचा वैचारिक लढा सुरूच राहील.” — शिवराज मोरे, प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस

