– स्थानिक विरुद्ध बाहेरचा मुद्दा कळीचा!; बाहेरील उमेदवार चिखलीची जनता स्वीकारणार का?
चिखली/बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) : अद्याप बराच वेळ असला तरी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आतापासूनच जोरदार राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, चिखली मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यांचे सुपुत्र आणि नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड यांनी चिखली मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवल्याने विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांच्यासमोर नवे राजकीय आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, सुख-दुःखाच्या प्रसंगात थेट मतदारांच्या दारात पोहोचून मृत्युंजय गायकवाड यांनी चिखलीत मोठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे. तथापि, चिखली मतदारसंघातील जनता हा ‘बाहेरील’ उमेदवार स्वीकारणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत किसान सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी फळी पाहायला मिळाली. चिखली विधानसभा मतदारसंघातील हा वाढता वावर आगामी काळात कोणत्या राजकीय वळणावर जातो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, चिखलीचा गड राखण्यासाठी श्वेताताई महाले या आव्हानाला कशा प्रकारे उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
स्थानिक विरुद्ध बाहेरचा मुद्दा कळीचा?
चिखली मतदारसंघाचा इतिहास पाहता, येथील मतदार ‘बाहेरचा’ नेता स्वीकारण्याबाबत नेहमीच सावध पवित्रा घेतात. मृत्युंजय गायकवाड हे शेजारच्या बुलढाणा मतदारसंघातील असले, तरी चिखलीत त्यांनी ज्या पद्धतीने बांधणी सुरू केली आहे, ती पाहता येथील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान भाजप आमदार श्वेताताई महाले यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) या युवा नेत्याने सुरू केलेल्या शिरकावामुळे महायुतीमधील अंतर्गत संघर्षाची चर्चाही आता रंगू लागली आहे.

