‘शौर्य-साहसाचे वंदन’: जवान संदीप ठेंग यांचा शेलगाव जहांगीरमध्ये भव्य नागरी सत्कार

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

१७ वर्षांच्या देशसेवेनंतर जवानाचे जल्लोषात स्वागत; चिखली ते शेलगाव निघाली दुचाकी रॅली

चिखली (तालुका प्रतिनिधी) भारतीय सैन्य दलातील ‘बॉम्बे इंजिनिअर ग्रुप’मध्ये १७ वर्षांची प्रदीर्घ आणि यशस्वी सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले जवान हवालदार संदीप राधाकिसन ठेंग यांचे गुरुवारी त्यांच्या जन्मभूमीत, शेलगाव जहांगीर येथे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित ‘सेवापूर्ती सन्मान सोहळा व भव्य मिरवणूक’ कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी आणि देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.

देशाच्या सीमांचे रक्षण करून आपल्या गृहनगरी परतलेल्या संदीप ठेंग यांचे चिखली येथील खंडाळा चौफुलीवर आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सैनिक बी. आर. काळे, शेतकरी नेते विनायक सरनाईक आणि भाजपाचे संतोष काळे पाटील यांच्या वतीने ठेंग यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. चिखली ते शेलगाव जहांगीर या मार्गावर जवानाच्या सन्मानार्थ भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. गावात आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या पुष्पवृष्टीने वातावरण चैतन्यमय झाले होते. या मिरवणुकीत युवक, महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेलगाव जहांगीर येथील मुख्य सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. नागरी सत्कार समारंभात चिखलीचे नगराध्यक्ष पंडीतराव देशमुख, अंकुशराव पाटील पडघान, विनायक सरनाईक, ग्रामपंचायत प्रशासन आणि विविध स्थानिक संस्थांच्या वतीने संदिप ठेंग यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना कर्नल (नि.) सुहास जतकर म्हणाले की, “आपले तारुण्य देशसेवेसाठी अर्पण करणाऱ्या सैनिकांमुळेच आज गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. सैनिकी जीवनातील शिस्त, त्याग आणि समर्पणाचा वारसा नव्या पिढीने आदर्श म्हणून जोपासावा.” सत्काराला उत्तर देताना हवालदार संदिप ठेंग यांनी आपल्या सैन्य दलातील अनुभवांना उजाळा देत ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्याला माजी सैनिक शिवराम निकम, सवडे, ज्ञानेश्वर ठेंग, रामेश्वर सोळंकी, श्रीकृष्ण बंगाळे, डॉ. विलास बोर्डे, भिमराव भिसे, सरपंच अरुण सरनाईक यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली.

Share This Article
Exit mobile version