-आळंदी पोलीस स्टेशनच्या शांतता कमेटी बैठकीत मार्गदर्शन; मिरवणुका वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आळंदी पंचक्रोशीत पारंपरिक पद्धतीने, उत्साही आणि शांततेत साजरी करावी, असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी केले. जयंती निमित्त होणाऱ्या मिरवणुका व कार्यक्रमांसाठी पोलीस बंदोबस्त आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, मात्र मिरवणुका वेळेत सुरू करून मर्यादित वेळेत पूर्ण कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
मिरवणुकीबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, १४ एप्रिल रोजी मिरवणुका काढल्यास रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी राहील, तर इतर दिवशी मिरवणुकांसाठी रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी असेल. त्यामुळे शक्यतो सर्वांनी १४ एप्रिललाच मिरवणुका आयोजित कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. तसेच ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवाजाची मर्यादा पाळावी आणि फटाक्यांच्या वापरात संयम ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन करताना, आंबेडकरांच्या समता, बंधुता, शिक्षण आणि संघर्ष या मूल्यांचा समाजाने स्वीकार करावा, असे सांगितले. बाबासाहेबांचे विचार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीदरम्यान श्री रामनवमी निमित्त आळंदी येथे झालेल्या पालखी मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल आवेकर भावे रामचंद्र संस्थानच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके आणि पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन निसार सय्यद यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

