-राष्ट्रकुल संसदीय परिषदेत प्रभावी मांडणी; ‘ब्रेन ड्रेन’ थांबवण्यावर भर
पणजी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @२०४७’ या स्वप्नपूर्तीसाठी तरुणांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून देशाच्या प्रगतीचा पाया तरुण शक्तीमध्येच आहे, असे प्रतिपादन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले.
भारताची सुमारे ६५ ते ७४ टक्के लोकसंख्या ४० वर्षांखालील असून हीच देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘अटल इनोव्हेशन मिशन’ यांसारख्या योजनांद्वारे तरुणांना सक्षम करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ‘ब्रेन ड्रेन’ या गंभीर विषयावरही भाष्य केले. आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएससारख्या नामांकित संस्थांमधून शिक्षण घेतलेले अनेक तरुण परदेशात स्थायिक होत असून त्यांच्या प्रतिभेचा फायदा भारताला होत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय विद्यापीठांना जागतिक दर्जा प्राप्त करून देणे आणि प्रवासी भारतीयांना देशाच्या विकासात सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार ‘विकसित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी कार्यरत असून विविध योजनांद्वारे तरुण, महिला व शेतकरी वर्ग सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांमध्ये उच्च शिक्षण, नैतिकता, पारदर्शकता आणि देशभक्तीची भावना विकसित झाली तर तेच भविष्यात देशाचे खरे शिल्पकार ठरतील, असे मत व्यक्त करत राष्ट्रकुल परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळणे अभिमानास्पद असल्याची भावना आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केली.

