नागपूरच्या काटोलमध्ये मृत्यूचं तांडव! स्फोटक कंपनीत भीषण धमाका; 17 कामगारांचा बळी, रक्ताच्या थारोळ्यात कित्येक जखमी!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– प्रशासनाच्या नाकाखाली मृत्यूचे कारखाने की कत्तलखाने? वर्षभरात दुसरा मोठा स्फोट; कामगारांच्या जिवाशी खेळणाऱ्यांना फासावर लटकवा!; नागरिकांचा संताप

नागपूर (विशेष प्रतिनिधी) – उपराजधानी नागपूरच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव परिसरात आज रविवारी सकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास काळाने घाला घातला. ‘एसबीएल एनर्जी’ या स्फोटक बनविणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 17 निष्पाप कामगारांचा जागीच कोळसा झाला, तर 18 हून अधिक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. हा स्फोट इतका भयानक होता की, त्याचे पडसाद कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आले. रक्ताचे सडे, छिन्नविछिन्न झालेले मृतदेह आणि आक्रोश पाहून पाषाणहृदयी माणसाच्याही डोळ्यात पाणी येईल, असे भीषण दृश्य घटनास्थळी पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘एसबीएल एनर्जी’ या कंपनीच्या बी-२० प्लांटमध्ये पहाटेच्या सुमारास डेटोनेटरला वायर जोडण्याचे काम सुरू असताना अचानक मोठा धमाका झाला. या धमाक्याची तीव्रता इतकी प्रचंड होती की, बाजूचा बी-१६ प्लांटही पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. सिमेंटच्या भिंती आणि लोखंडी पत्रे कागदासारखे हवेत उडाले. परिसरात गनपावडर आणि स्फोटकांचा साठा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले, ज्यात कामगारांना बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही. याच राऊळगाव शिवारात वर्षभरापूर्वी १६ फेब्रुवारी रोजी ‘एशियन फायर वर्क्स’मध्ये असाच स्फोट होऊन दोघांचा बळी गेला होता. तरीही झोपी गेलेले प्रशासन जागे झाले नाही का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. कामगारांच्या सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून हे मृत्यूचे कारखाने कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. “हा अपघात नसून नरसंहार आहे! जे प्रशासन आणि मालक कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा. नुसत्या चौकशीच्या घोषणांनी गेलेले जीव परत येणार नाहीत!” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
—-
मदतीचा ओघ आणि संतापाचा लाव्हा

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी धाव घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप असून, “आमचे हक्काचे माणसं गेले, आता चौकशीचं काय चाटायचं?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Exit mobile version