-चिखला काकड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हजारोंची उपस्थिती; निष्पक्ष चौकशीची मागणी
दुसरबीड (भगवान नागरे) : दि. २३ फेब्रुवारी रोजी बीबी येथे वंजारी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, चिखला काकड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले.
मेळाव्यात काही वक्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत विदर्भात जातीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या नावांचा उल्लेख करत स्थानिक राजकारण विदर्भात आणू नये, असे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, चिखला काकड येथे पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे; मात्र वंजारी समाजाने हे आरोप फेटाळले. काही वक्त्यांनी संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज तपासावे व सत्य सार्वजनिक करावे, अशी मागणी केली.
मेळाव्यास माजी आमदार तोताराम कायंदे, माजी खासदार सुखदेव काळे, सतीश कायंदे, प्रभाकर ताठे, प्रा. सुभाष दराडे, भगवानराव सानप, प्रकाश गिते, आत्माराम कायंदे, दीपक बुधवंत, दीपक घुगे, डॉ. सुनील केंद्रे, दीपक कायंदे यांच्यासह वंजारी समाजातील शेकडो पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सिद्धेश्वर आंधळे यांनी केले. मेळाव्यातील वक्त्यांनी प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, आवश्यक असल्यास आधुनिक तपास पद्धतींचा वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

