काळोना गावाच्या मूलभूत प्रश्नांसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण

breakingmah Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-रस्त्याची दयनीय अवस्था अधिकाऱ्यांच्या गाडीच्या बिघाडातूनच उघड; प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

चिखली (राजेंद्र घुबे) :  राज्य एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असून स्मार्ट सिटी, समृद्धी महामार्ग आणि मेट्रोसारख्या आधुनिक सुविधा उभ्या राहत असताना, ८० टक्के ग्रामीण भागात वसलेल्या महाराष्ट्रातील अनेक गावे आजही विकासापासून कोसो दूर असल्याचे वास्तव समोर येत आहे. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे काळोना गाव. असंख्य मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले हे गाव आजही महसूल नकाशावर नोंदलेले नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार अधिकाऱ्यांकडे चकरा मारूनही काहीच हाती लागत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

काल दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, विशाल थुट्टे, इतर सहकारी तसेच काळोना गावातील महिला व पुरुष ग्रामस्थ बेमुदत आमरण उपोषणास बसले होते. काळोना गाव महसूल पटलावर घेणे, गावाकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था तात्काळ दुरुस्त करणे, स्मशानभूमीची समस्या मार्गी लावणे तसेच खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित असलेल्या गावाला पाणीपुरवठा सुरू करणे, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाच्या निमित्ताने प्रशासनातील अधिकारी गावात दाखल झाले आणि रस्त्याची वास्तविक अवस्था प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. अंडेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्या बोलेरो गाडीने गावात आले होते, त्या बोलेरो गाडीचे चेंबर अत्यंत खराब रस्त्यामुळे फुटले आणि गाडी रस्त्यातच बंद पडली. अवघ्या एका दिवसासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची ही अवस्था होत असेल, तर गावकरी रोज किती त्रास सहन करत असतील, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा उपोषणस्थळी होत होती. उपोषणाची दखल घेत प्रशासनातील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शविली. उपोषणस्थळी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांचे सासरे यांनी रस्ता व स्मशानभूमीच्या कामासाठी निधी देण्याचे कबूल केले. तसेच जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार व केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांनी दूरध्वनीवरून गावच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस आश्वासन दिले.

सर्व मागण्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला काही कालावधी देणे आवश्यक असल्याने, तसेच सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे पहिल्याच दिवशी उपोषणाची सांगता लिंबू सरबत देऊन करण्यात आली. यावेळी चिखली तहसीलचे नायब तहसीलदार गायकवाड साहेब, अंडेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शक्करगे साहेब व त्यांचा कर्मचारी वर्ग, पाटबंधारे विभागाचे पांडे साहेब, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे चेके साहेब यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पंचक्रोशीतील पंजाबराव जावळे, विष्णू पाटील घुबे, प्रा. उद्धव घुबे सर, सतीश पाटील भुतेकर, उषाताई थुट्टे पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उद्धव पाटील थुट्टे, भिकन पाटील भुतेकर, ऋषी भोपळे, प्रशांत जेवाळ यांचीही उपस्थिती होती. उपोषणात संतोष पाटील भुतेकर, विशाल थुट्टे, गणेश उसर, गजानन उसर, समाधान उसर, मधुकर उसर, समाधान गाडेकर, सावनसिंग उसर, सिद्धेश्वर उसर, विठ्ठल उसर, विलास उसर, तुकाराम उसर, ज्ञानेश्वर उसर, सुखदेव गाडेकर, शिवाजी गाडेकर, रंगनाथ शिंदे, भास्कर शिंदे, शिवाजी उसर, रमेश उसर, नारायण सर, विजय उसर यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.

Share This Article
Exit mobile version