-ग्रामीण महिलांच्या आनंदोत्सवाला सामाजिक जाणीवेची जोड
देऊळगाव घुबे (चिखली) : मकर संक्रांतीनिमित्त ग्रामीण भागातील खैरव गावात महिलांसाठी हळदी–कुंकूचा कार्यक्रम अॅड. रुपाली गोपाल चौधरी यांच्या पुढाकाराने उत्साहात पार पडला. शहरांमध्ये अशा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते; मात्र ग्रामीण भागात महिलांसाठी असे उपक्रम होणे म्हणजे आनंदोत्सवच असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
हा कार्यक्रम आनंदी व आपुलकीच्या वातावरणात पार पडला. शिक्षित व सुसंस्कृत व्यक्तींनी गावाकडे वळून ग्रामीण समस्या समजून घेतल्या, तर त्या नक्कीच सुटू शकतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमामुळे महिलांना आपले विचार मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. गावकऱ्यांनी व उपस्थित महिलांनी अॅड. रुपाली ताईंचे आभार मानत, भविष्यातही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून ग्रामीण महिलांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

