धुळे (ब्युराे चीफ) – यावर्षी सुरवातीलाच राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. पिण्यासाठी लागणारा पुरेसा जलसाठा सर्वत्र उपलब्ध झाला आहे, मात्र या अतिरिक्त पावसाने धुळे जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील मुख्य पिके, मका, कापूस व भरड अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतातील तण देखील शेतकऱ्यांना काढता आले नसल्याने निंदणी व कोळपणी तर करता आलीच नाही. मात्र खते सुध्दा देता आली नाहीत आणि त्यामुळे पिकांवर मारलेली फवारणी देखील वाया गेली. महागडे खते, बी बियाणे, फवारणी व मजुरी देखील या पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासनाने धुळे जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतातील पिकांचे कृषी व महसूल विभागाने पंचनामा करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टर सरसकट मदत जाहीर करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी महेश मिस्तरी, अतुल सोनवणे, भगवान करणकाळ, प्राध्यापक शरद पाटील, कैलास पाटील यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


