२६ वर्षांनंतर काँग्रेस–वंचितची युती; मुंबई महापालिका ताकदीने लढवणार

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-हा संख्येचा खेळ नसून विचारांचा मेळ – हर्षवर्धन सपकाळ
-भाजपाला रोखण्यासाठीच युतीचा निर्णय – प्रा. धैर्यवर्धन फुंडकर

मुंबई /बुलढाणा (बाळू वानखडे) : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर आज, २८ डिसेंबर रोजी शिक्कामोर्तब झाले. मुंबईतील टिळक भवन येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली. विशेष म्हणजे तब्बल २६ वर्षांनंतर हे दोन पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत.

ही युती केवळ संख्येचा खेळ नसून विचारांचा मेळ असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. तर भाजपासारख्या देशविघातक शक्तींना रोखण्यासाठीच ही युती करण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन फुंडकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनीच या युतीची घोषणा झाल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असून सर्वच पक्ष युती व आघाड्यांच्या समीकरणांत गुंतले आहेत. विशेषतः जगाची आर्थिक ‘नाडी’ मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेवर सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सत्ता काबीज करण्यासाठी विविध पातळ्यांवर राजकीय तडजोडी सुरू असताना काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत वंचित बहुजन आघाडीबरोबर युती केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या संमतीने व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढाकाराने ही युती निश्चित झाली. या युतीअंतर्गत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

याआधी १९९८ व १९९९ साली भारिप बहुजन महासंघ व काँग्रेस यांची युती होती. त्या युतीतून ॲड. प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. तसेच १९९९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात भारिप बहुजन महासंघाचे स्व. मखाराम पवार, डॉ. दशरथ भांडे आणि रामदास बोडखे मंत्री होते. त्यानंतर युती फिस्कटल्यानंतर आज तब्बल २६ वर्षांनी हे दोन पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. या युतीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतला असून युवा नेते सुजातदादा आंबेडकर, सुमित आनंद, सिद्धार्थ मोकळे यांच्यासह इतर नेत्यांचेही योगदान असल्याचे प्रा. धैर्यवर्धन फुंडकर यांनी सांगितले. कोण किती जागा लढणार यापेक्षा विचारांना प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट करत ही युती भविष्यातही कायम राहील, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

सदर युती सध्या मुंबई महानगरपालिकेपुरती मर्यादित असून येणाऱ्या स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत युतीचे अधिकार संबंधित जिल्हा पातळीवर देण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, वंचितचे चेतन अहिरे, स्नेहल सोनी, सागर गवई यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version