फार्मर आयडीचा घोळ, शेतकऱ्यांचा घास हिरावला! हेक्टरी १० हजारांच्या अनुदानावर पोर्टलचा डल्ला!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– स्पेलिंग मिस्टेक, क्षेत्रफळ गडप; हजारो शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित — दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा विनायक सरनाईक यांचा इशारा!

चिखली (रंजना मोरे) – शासनाच्या ‘डिजिटल सुधारणा’ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार होत्या; पण प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांच्या मानेवरच बसल्या! फार्मर आयडीतील तांत्रिक चुकांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील, विशेषतः चिखली तालुक्यातील हजारो शेतकरी हेक्टरी १० हजार रुपयांच्या रब्बी अनुदानासह नुकसानभरपाईपासून थेट वंचित राहिले आहेत. चूक शेतकऱ्यांची नाही, तरी शिक्षा मात्र त्यांनाच! राज्यात अॅग्रीस्टॅक मोहीम राबवून शेतकऱ्यांना अकरा अंकी फार्मर आयडी देण्यात आला. आधारकार्डप्रमाणेच हा आयडी आता बंधनकारक करण्यात आला असून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ याच आयडीवर अवलंबून आहे. मात्र याच फार्मर आयडीतील स्पेलिंग मिस्टेक, क्षेत्रफळातील तफावत, पोटखराब क्षेत्राची नोंद न होणे अशा गंभीर त्रुटींमुळे शेतकरी अक्षरशः अडकले आहेत.

 

यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणले, सातबाऱ्यावर नोंदी झाल्या, वाटणीपत्रक पूर्ण झाले; मात्र फार्मर आयडीमध्ये हे क्षेत्र दिसतच नसल्याने शासन योजनांचा लाभ थांबला आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामात जमीन घेतली, काहींनी वहिती केली, तरीही फार्मर आयडी अपडेट न झाल्याचा फटका थेट रब्बीच्या हेक्टरी १० हजार रुपयांच्या अनुदानावर बसला आहे. क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी यापूर्वीच या त्रुटींची दखल घ्यावी, दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दुरुस्ती शक्य असल्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात फार्मर आयडी काढल्यानंतर दुरुस्ती होत नाही किंवा झाली तरी महिनोन्‌महिने रखडते. या प्रशासकीय ढिसाळपणामुळे शेतकऱ्यांचे अनुदान व नुकसानभरपाई थांबली आहे. शासनाने रब्बी पेरणीसाठी हेक्टरी १० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. पेरणीपूर्वी मिळणे अपेक्षित असलेले हे अनुदान मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. आजही हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. ज्यांना अनुदान मिळाले, त्यांनाही शासन आदेशानुसार पूर्ण रक्कम मिळालेली नाही. उर्वरित रक्कम कधी देणार? पेरणीसाठी जाहीर केलेले अनुदान हरभऱ्याच्या सोंगणीवेळी देणार का? असा थेट सवाल विनायक सरनाईक यांनी उपस्थित केला आहे.

 


आक्रमक मागण्या व इशारा : फार्मर आयडीमध्ये तातडीने ‘एडिट ऑप्शन’ उपलब्ध करून द्यावा, स्पेलिंग मिस्टेक व क्षेत्रफळ दुरुस्ती त्वरित करावी, आधी दुरुस्त केलेल्या आयडींना तात्काळ मान्यता द्यावी, सातबाऱ्याप्रमाणे क्षेत्रफळ फार्मर आयडीमध्ये समाविष्ट करावे, पोटखराब लागवडीखाली आणलेले क्षेत्र नोंदवावे आणि या तांत्रिक चुकांमुळे रखडलेली नुकसानभरपाई व अनुदान तातडीने अदा करावे, अशी ठाम मागणी सरनाईक यांनी मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ही चूक शेतकऱ्यांची नसून पोर्टलची आहे. तरीही शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. लवकरात लवकर सुधारणा करून न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा कडक इशारा विनायक सरनाईक यांनी दिला आहे.

Share This Article
Exit mobile version