– खळेगावात तेली समाजाची एकजूट झळकली
साखरखेर्डा (अशोक इंगळे) — समाज किती मोठा किंवा लहान याने काही फरक पडत नाही; पाच पांडवांनी एकजुटीने जसे पराक्रम गाजवले, तशीच एकात्मता आपल्या तेली समाजात आली, तर कोणताही बदल अशक्य नाही, असे प्रभावी प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे यांनी केले. खळेगाव येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावात समाजाची घरे मोजकी असली, तरी पांडवांप्रमाणे एकत्रित राहून समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतल्याने या जयंतीला विशेष उठाव मिळाला, असे त्यांनी गौरवोद्गार काढले.
जयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुभाष बबनराव देव्हडे यांच्या भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय सचिव रमेश आकोटकार, माजी अध्यक्ष विष्णूपंत पाखरे, मेहकर येथील संताजी केंद्राचे अध्यक्ष सतीश गायकवाड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अशोक इंगळे, जिल्हा सचिव नंदकिशोर गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष सुषमाताई राऊत, जिल्हा उपाध्यक्ष विजय सोनुने, चिखली तालुकाध्यक्ष दत्तात्रय करवंदे, बंडू वाघमारे, गजानन वाडेकर, उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ सोनटक्के, जिल्हा संघटक दुर्गादास आकोटकार, अकोला जिल्हा संघटक जयेश भिसे आणि डॉ. गंगाधर क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित विविध मान्यवरांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत समाजातील ऐक्य, शिक्षण, मेहनत आणि मानवतेचा संदेश अधोरेखित केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव क्षिरसागर यांनी केले, तर सुबक आणि तालबद्ध संयोजन अश्विनी क्षिरसागर आणि प्रणिता क्षिरसागर यांनी केले. कार्यक्रमात लहानग्या मुलांनीही संताजी महाराजांविषयीच्या विचारांचे मनमोकळे सादरीकरण करत वातावरण भारावून टाकले. समाजातील ऐक्य, परंपरा आणि संस्कारांचा संदेश देणारा हा जयंती उत्सव सर्वांच्या मनात घर करून गेला.

