– शेतकऱ्यांना लाभाऐवजी अन्याय; कोटेशन भरूनही विजेची प्रतीक्षा!
बुलढाणा/नागपूर (बाळू वानखेडे) – शासनाने मोठ्या दिमाखात “मागेल त्याला सौर पंप” अशी घोषणा करून शेतकऱ्यांच्या आशांना पंख दिले; मात्र प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांपासून जोडण्या थांबवून ठेवत ही योजना कागदावरच अडकवली आहे. एकीकडे ‘एकराची अट’ लावून हजारो शेतकऱ्यांना योजनेस पात्रतेबाहेर ढकलले, तर दुसरीकडे कोटेशन भरल्यानंतरही विजेची जोडणी नाकारून सरकार शेतकऱ्यांची थट्टाच करीत असल्याचा आरोप मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारवर केला.
शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारच्या चौकात!
अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना खरात म्हणाले, “अंतरावरून पाणी आणायची वेळ असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा शासनाने कोणताच विचार केलेला नाही. पंपाची क्षमता अपुरी, जोडण्या बंद आणि एकराची अट—या तिन्ही गोष्टींनी योजना पूर्णपणे फसवी ठरली आहे. मागेल त्याला सौर पंप योजनेतील एकराची अट तातडीने रद्द करून, गेल्या तीन वर्षांपासून प्रतिक्षेत अडकलेल्यांना तत्काळ विजेची जोडणी द्यावी, अशी मागणी त्यांनी अधिवेशनात ठामपणे केली. यापूर्वीच्या अधिवेशनातही खरात यांनी मतदारसंघातील विविध प्रश्न अभ्यासपूर्वक मांडले होते; मात्र शासनाकडून सकारात्मक निर्णय न निघाल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत.

