आर्थिक अडचणींच्या छायेतही ‘केदारेश्वर’ गाळपासाठी सज्ज!

admin 2 Min Read
2 Min Read

– “अधिक ऊस द्या, हंगाम यशस्वी करा” — अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे

नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – आर्थिक अडचणींवर मात करत केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाला सुरुवात केली आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांनी अधिकाधिक ऊस गाळपास देऊन हंगाम यशस्वी करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी केले. गळीत हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन ज्येष्ठ पत्रकार रावसाहेब निकाळजे, बाळासाहेब खेडकर, अनिल कांबळे, उद्धव देशमुख, जयप्रकाश बागडे आणि इसाक शेख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

ऋषिकेश ढाकणे म्हणाले, “हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी आम्ही जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारखाना अत्यंत अडचणीत सुरू झाला असला तरी कामगार, ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचा लाभ होईल, यासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील. शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल.” कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे, ज्येष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर, डॉ. प्रकाश घनवट, त्रिंबक चेमटे, शहाजी जाधव, मोहनराव दहिफळे, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, चिफ इंजिनियर प्रवीण काळोशे, चिफ केमिस्ट रामनाथ पालवे, आकाऊंट प्रमुख तीर्यराज घुंगरड, शेतकी विभाग प्रमुख अभिमन्यू विखे, परचेस अधिकारी तुकाराम वारे, सिव्हिल विभाग प्रमुख संजय चेमटे, संगणक विभाग प्रमुख भगवान सोनवणे, केनयार्ड सुपरवायझर किसन पोपळे, सुरक्षा विभाग प्रमुख केसभट आदी उपस्थित होते.


पत्रकारांना ‘दुसऱ्यांदा’ सन्मान

केदारेश्वर साखर कारखान्याने पत्रकार सन्मानाची परंपरा कायम ठेवत ग्रामीण पत्रकारांना साखर पोत्याच्या पूजनासाठी यंदाही मानाचे आमंत्रण दिले. कारखान्याच्या इतिहासात स्व. दा. प. आपटे, महादेव कुलकर्णी आणि रामदास ढमाले यांच्या नंतर दुसऱ्यांदा पत्रकारांना पूजनासाठी आमंत्रित करण्यात आले. विधिवत पूजन करून पत्रकारांचा गौरव करण्यात आला. सहकारी संस्थांमध्ये पत्रकारांना असा मान देणारा संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कारखाना म्हणजे केदारेश्वर, अशी सर्वसाधारण भावना व्यक्त झाली. ग्रामीण भागातील पत्रकार सन्मान हा कारखान्याच्या मानवी मूल्यांचे दर्शन घडवणारा उपक्रम ठरला.

Share This Article
Exit mobile version