– भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांची खंत – बोधगयाच्या महाविहाराचाही अपेक्षित निर्णय दिला नाही! – जागतिक धम्म परिषदेने बुलढाणा बनले धम्ममय!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – सरन्यायाधीश हे भारताचे सर्वोच्च पद आहे. या पदाला खर्याअर्थाने न्याय देण्याचे काम प्रामाणिक व्यक्तीच करू शकते. भूषण गवई यांना ही संधी मिळाली. सध्या सरकारच अन्यायकारी झाले आहे. गवई हे वास्तवतेला धरून निर्णय घेत संविधान रक्षक बनू शकले असते. बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचेच आहे, याचे भक्कम पुरावे आहेत. त्यावरही सच्चा निर्णय गवई यांना देता आला असता, असे परखड मत भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांनी बुलढाणा येथे व्यक्त केले. प्रबुद्ध भारत घडविण्यासाठी मूकनायक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी दि.२२ नोव्हेंबररोजी जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली होती. याप्रसंगी भन्तेजी बोलत होते.
धम्मबांधवांच्या सहकार्याने सलग दुसर्या वर्षी जागतिक स्तरावरील ही बौद्ध धम्म परिषद जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर घेण्यात आली. जागतिक कीर्तीचे धम्मगुरु, बुद्ध तत्वज्ञान अभ्यासक, संशोधक, तथागतांचा मानवतावादी जागतिक कल्याणाचा प्रज्ञा, शील, मैत्रीचा संदेश आपल्या पांडित्यपूर्ण आणि करुणामय वाणीने जगभर प्रचार, प्रसार करणारे पूज्य भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांनी मानवी कल्याणासाठी तथा विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत विनयशील व विज्ञानवादी समाज घडविण्यासाठी धम्मदेसना दिली. यावेळी भन्ते ज्ञानरक्षित थेरो, भन्ते उदितज्ञान थेरो, भन्ते यश थेरो, भन्ते धम्मसेन थेरो, भन्ते पुण्ण, भन्ते वेण धम्म चेती, भन्ते गुणानंद अभिभू यांची मंगल उपस्थिती होती. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गजानन घिरके, ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब जाधव यांची उपस्थिती होती. भिक्खू संघाच्या मंगल वाणीतून बुद्धांचे विचार श्रवण करण्यासाठी जिल्हाभरातून बौद्धबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर भन्ते गुणानंद अभिभू यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण या विषयावर धम्मदेसना दिली. भन्ते यश थेरो यांनी युवकांसाठी बौद्ध धर्मावर, भन्ते उदितज्ञान थेरो यांनी वर्तमान परिस्थितीत धम्माची आवश्यकता, भन्ते ज्ञानरक्षित थेरो यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म यावर धम्मदेसना दिली. भन्ते धम्मसेन थेरो, भन्ते पुण्ण, भन्ते वेण धम्म चेती यांनी बुद्धधम्माविषयी प्रवचन केले. जगाच्या कल्याणासाठी बुद्ध शासन किती गरजेचे आहे, याबाबत उपासकांना उपदेश करताना भन्ते ज्ञानज्योती महाथेरो म्हणाले, प्रबुद्ध भारत निर्माणासाठी धम्मबांधवांनी एकजुटीने कार्य करावे. बुद्धांनी सांगितलेल्या तत्वानुसार कार्य करावे. बुद्ध, डॉ. बाबासाहेब आणि संविधान संपविण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. मतदान यंत्राबाबत बोलताना भन्तेजी म्हणाले, सध्या बेकायदेशीरपणे राज्य सुरू आहे. लोककल्याणऐवजी लोकांना धाक दाखवून गुलामीकडे नेण्याचा डाव आखला आहे. लोकशाही मार्गाने नाही तर ठोकशाहीने राज्य करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर केला जात आहे. जगात असे कुठलेच यंत्र नाही, जे हॅक होऊ शकत नाही. मी म्हटले होते बिहारच्या निवडणुका हॅक होतील. परिणाम आपल्यासमोर आहे, असा आरोप भन्तेजींनी केला. मतदान यंत्रावरही सरन्यायाधीशांनी निर्णय द्यायला हवा होता, असेही ते म्हणाले. बोधगया येथील महाविहाराविषयी सांगताना ज्ञानज्योती महाथेरो म्हणाले, राजेंद्र प्रसाद यांनी ते बुद्धिस्टांचे आहे देऊन टाका म्हणून सांगितले. पुढे १९४९ ला बीटीएमसी कायदा ब्राह्मणांच्या हातात गेला आणि विहारावर त्यांनी ताबा मिळवला. त्यासाठी आमची लढाई सुरू आहे आणि तुम्हा सर्वांच्या साथीने यश मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्याला यापुढे प्रत्येक धम्म कार्यात सहभाग घ्यायचा आहे, असा निर्धार सतीश पवार यांनी उपस्थितांच्या होकाराने व्यक्त केला. शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, शवपेट्या, स्वर्गरथ या सर्व व्यवस्था ज्या की आपल्याला सहकार्याने मिळत नाहीत, त्या उभ्या करायच्या आहेत, हा संकल्प पवार यांनी व्यक्त केला. त्याला उपस्थित धम्म बांधवांनी संमती देत आपला धम्म दानाचा वाटा देण्याचा शब्द दिला. दुपारी ध्यान साधना झाली. सायंकाळी सव्वाचार वाजता महापरित्राणपाठ, सायंकाळी साडेचार वाजता पुण्यानुमोदन कार्यक्रम पार पडला. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भीम आर्मी (भारत एकता मिशन), महार रेजिमेंट, बुद्धिस्ट टिचर्स असोसिएशन, कास्ट्राईब संघटना यांच्यासह धम्म उपासकांच्या सहकार्याने ही परिषद यशस्वी झाली. नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांनी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते. धम्म बांधवांनी व्यावसायिकांकडून साहित्य खरेदी करून व्यवसायाला हातभार लावला. तसेच महापुरुषांच्या प्रतिमा आणि वैचारिक पुस्तकांच्या ज्ञानाचा खजिनाही अनेकांनी सोबत नेला.
गवई यांच्या आई वाघीण .. भूषण गवई यांच्यापेक्षा त्यांच्या आई वाघीण निघाल्या. त्यांनी डरकाळी फोडली की संघाच्या कार्यक्रमात मी सहभागाr व्हावे, हे षडयंत्र आहे म्हणून! असेही भन्ते म्हणाले. बुलढाणा या ऐतिहासिक भूमीत दि. २२ नोव्हेंबररोजी सकाळी साडेनऊ वाजता धम्म रॅली आणि धम्म ध्वजारोहणाने जागतिक बौद्ध धम्म परिषदेचा शुभारंभ झाला. शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रांगणावर ही धम्म परिषद पार पडत आहे. पूज्य भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्यासह भिक्खू संघांचे प्रवचन आयोजित केले आहे. परिषदेच्या निमित्ताने मलकापूर रोडवरील आंबेडकरनगर येथील महामानवांच्या तीन पुतळ्यांपासून धम्म रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून कार्यक्रमस्थळी भिख्खू संघाचे आगमन झाल्यानंतर धम्ममय वातावरणात स्वागत करण्यात आले. याठिकाणी भन्ते यश थेरो यांच्याहस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. स्वागत समारंभानंतर मूकनायक फाउंडेशन पुरस्काराचे सतीश पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यानंतर भिक्खू संघाकडून धम्मदेसना देण्यास प्रारंभ झाला. या परिषदेत धम्म उपासक, उपासिका हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत.
११ रत्नांचा मूकनायक पुरस्काराने गौरव!
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या ११ प्रतिभावंतांचा भन्तेजींच्या प्रमुख उपस्थितीत मूकनायक फाउंडेशन पुरस्कार देऊन संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांच्याहस्ते गौरविण्यात आले. मूकनायक फाउंडेशन पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. पश्चिम बंगालमध्ये जिल्हाधिकारी असलेल्या अर्चना वानखेडे या काही कारणास्तव येऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे भाऊराव (बी.ओ.) बोर्डे यांना मरणोपरांत जाहीर झालेला पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारला. सामाजिक न्याय विभागाचे अमरावती विभागीय आयुक्त विजय साळवे, बुलढाणा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. कैलास झिने, सामाजिक व शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे भीमराव जाधव, उद्योजक डॉ. अर्चित हिरोळे, ज्येष्ठ साहित्यिक सागर जाधव यांच्यावतीने सुरेश जाधव, प्रशासन व समाजकार्य करणारे भीमराव मुगदल, सैन्य दलाचे सुभेदार श्रीराम जाधव, भारतीय डाक विभागाचे आशीष इंगळे, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ आराख यांचा सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ———–