कर्ता पुरूष चांगला असेल तरच घराला घरपण – हभप. सोपान महाराज शास्त्री

admin 4 Min Read
4 Min Read

– बळीराजा स्मृती समारंभात मार्गदर्शन; ‘कृषीयोध्दा’ युवकांचा सन्मान!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – आजचा दिवस बळी प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. बळीराजा याबद्दल समाजात फारशी माहिती नाही. पण जो जगाचा पोशिंदा आहे त्याला बळीराजा म्हटले जाते. घराचा कर्ता चांगला असला तर घरपण दिसते, गावाचा कर्ता चांगला असला तर गाव चांगलं राहतं, राज्याचा कर्ता चांगला असला तर राज्य चांगलं राहतं आणि देशाचा कर्ता चांगला असला तर देश चांगला राहतो. जसा राजा तथा प्रजा अशी परिस्थिती आहे. असे प्रबोधन हभप. सोपान महाराज शास्त्री यांनी बळीराजा स्मृती समारंभात केले. यावेळी सुप्रसिद्ध शेतीविषयक वेबसाइट्स चालविणारे ज्ञानेश्वर खरात पाटील, युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास मेहेत्रे, शेतकरी योध्दा विनायक भानुसे, शेतकरी योध्दा गजानन चव्हाण, उध्दव काकडे, बालाजी सोसे यांचा महाराज शास्त्री सानप यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपाचे पक्ष प्रवक्ते विनोद वाघ, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक नाना जाधव, सरकटे महाराज व्यासपीठावर उपस्थित होते.

सोपान सानप महाराज शास्त्री म्हणाले की, ९० टक्के शेतकरी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारीत सहभागी होतात. संत सावता माळी महाराज यांनी कर्माचा सिद्धांत चांगला सांगितला आहे. तुम्ही पेरणी करीत असाल आणि घरातील व्यक्ती मरण पावला असेल तर मढं झाकून पेरणी अगोदर करावी नंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, जसे आपण आचरण करत असतो तसेच आचरण घरातील व्यक्ती करीत असतात. दुसर्‍याच्या बुद्धीचा वापर ज्याला करता येतो त्याला नेता म्हणतात. राजकारण म्हणजे काय तर गरीबाच्या हक्कासाठी लढत राहणं, आम्हाला राजकारणी कमी बोलावतात आणि शेतकरी जास्त प्रवचन-कीर्तनासाठी बोलावतात. कारण आम्ही शेतकर्‍यांची बाजू घेऊन बोलतो. जोपर्यंत समाजाचं भलं होणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनातील भय जाणार नाही. राजकारण त्याच व्यक्तिने करावे की तो धनाने तृप्त असावा नाहीतर मनाने तृप्त असावा, म्हणजे तो भ्रष्टाचार करणार नाही. ज्यांची झोळी अगोदरच रिकामी तो समाजाला काय देणार, असेही शास्त्री महाराज यांनी उदाहरण देत सांगितले. या देशात दोनच व्यक्ती असे आहेत, ते देश सांभाळतात एक जवान दुसरा किसान, आज दोघांची अवघड परिस्थिती आहे. देशाचे पंतप्रधान आपली दिवाळी सैनिकांबरोबर साजरी करतात. त्यांना हवी असलेली सेवा पुरविली जाते असा एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. पण किसानाकडे त्यांचे लक्ष नाही. त्यांनी त्याच्याकडं लक्ष द्यावे. कारण या देशात उद्योगपती जी वस्तू तयार करतो त्याचा भाव तो ठरवितो, मग किसान जर शेती पिकवित असेल तर शेत मालाचे भाव त्यांना ठरवू द्या! पण तसे होत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. शेतमालाला योग्य भाव मिळावा हीच त्यांची मागणी आहे. जर ते मिळाले तर शेतकरी कोणापुढे हात पसरवून भीक मांगणार नाही, असेही त्यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार सिद्धेश्वर आंधळे यांनी मानले.


मी प्रथम शेतकर्‍यांचा प्रवक्ता मग पक्षाचा – विनोद वाघ

या जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. त्यांच्या समस्या मांडताना पक्ष बाजूला सारून त्यांच्या न्याय हक्कासाठी मी कधीही रस्त्यावर यायला तयार आहे. प्रथम शेतकरी जगला पाहिजे, तरच आपण जगू. त्यासाठी मी अनेक वेळा आंदोलन केली आहेत. त्यामुळे मी प्रथम शेतकर्‍यांचा प्रवक्ता आहे नंतर पक्षाचा, असे उद्गार भाजपचे प्रदेश पक्ष प्रवक्ते विनोद वाघ यांनी काढले. लोकजागर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गिते यांनी आपल्या प्रास्ताविकात शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचा आज बळीराजा स्मृती प्रित्यर्थ सन्मान केला पाहिजे, हा हेतू लोकजागर परिवाराचा आहे. यानंतर माझी पुढील दिशा हा राजकीय असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This Article
Exit mobile version