– सरकार थातूरमातूर शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत; पुन्हा फसवाफसवी होण्याची शक्यता!
– आधीच्या कर्जमाफीतून साडेपाच लाख शेतकरी वंचित राहिले; त्यामुळेच ३३ हजार शेतकरी आत्महत्या झाल्यात!
बुलढाणा/चिखली (राजेश लोखंडे) – राज्यातील शेतकरी नेत्यांनी वज्रमूठ आवळताच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या हालचाली चालविल्या असून, थातूर मातूर कर्जमाफी करून पुन्हा एकदा शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा, आधी साडेपाच लाख शेतकर्यांची राहिलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना पूर्ण करा, मगच खर्याअर्थाने शेतकरी कर्जमुक्तीसाठी पाऊले उचला, अशी मागणी शेतकरी नेते शेणफडराव घुबे यांनी फडणवीस-पवार सरकारकडे केली असून, आधीची अर्धवट कर्जमाफी योजना पूर्ण झाली नाही तर शेतकर्यांतील संताप जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बच्चू कडू, रविकांत तुपकर व प्रकाश पोहरे यांनी रचनात्मक दृष्टीने एकत्र येऊन २००२ ते २०२५ पर्यंत सरसकट शेतकर्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी एकत्रित जनआंदोलन उभे करून करावी लागेल, अशी सूचनाही त्यांनी या शेतकरी नेत्यांना केली आहे.
फडणवीस सरकार यासाठी जबाबदार आहे की, देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील आहेत व ते तिसर्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. असे असताना विदर्भातील शेतकरी वंचित रहावा, व विदर्भातील शेतकर्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या व्हाव्यात, ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. म्हणून फडणवीस सरकार यासाठी जबाबदार आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे, असेही ते म्हणाले. आता सध्या विरोधी पक्ष व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी कर्जमाफीसाठी आंदोलने व मोर्चे आयोजित करीत आहेत. हे जरी खरे असले तरी नेमकी कर्जमाफी कशी करायची? केंव्हापासून करायची, याबाबत कुणीही ठोस लेखी स्वरुपात मागणी केल्याचे दिसून येत नाही. तेंव्हा फक्त कर्जमाफी द्या, कर्जमाफी द्या, असे म्हणून चालणार नाही तर त्यासाठी, बच्चू कडू, रविकांत तुपकर व प्रकाश पोहरे यांनी रचनात्मक दृष्टीने एकत्र येऊन २००२ ते २०२५ पर्यंत सरसकट शेतकर्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी एकत्रित जन आंदोलन उभे करून करावी लागेल, असेही शेणफडराव घुबे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या भाषणातून शेतकर्यांचा सातबारा कोरा, कोरा कोरा करु, असे आश्वासन दिले होते. सध्या अतिवर्षणामुळे शेतकरी हवालदिल तर आहेच, परंतु हे सरकार विरोधक एकत्र येत असल्याची चिन्हे दिसत असल्याने थातूर मातूर कर्जमाफी जाहीर करून व थोड्या फार दुष्काळी योजना जाहीर करून वेळ मारुन नेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अजित पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेता अर्थमंत्री पदावर असल्यामुळे फडणवीस यांना गोड गोड बोलून विदर्भाला पुन्हा चुना लावण्याइतपत एकनाथ शिंदे व अजित पवार हे नक्कीच कमी नाहीत, अशी टीकाही शेणफडराव घुबे यांनी केली आहे.तेंव्हा आता शेंडी तुटो कि पारंबी तुटो. आता फक्त एकच नारा., सात बारा कोरा, कोरा कोरा!
——————

