– तहसीलदार, बीडीओंनी केल्या ग्रामस्थांच्या मागण्या मान्य; लवकरच जिल्हाधिकार्यांसोबत बैठक
किनगावराजा (शिवम नागरे) – किनगांवराजा येथे ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी बी.डी.घुगे, ठाणेदार संजय मातोंडकर, शिवराज कायंदे, छगन खंडारे यांच्या मध्यस्थीने उपोषण सुटले आहेत. ग्रामस्थांनी दि.१५ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला सुरवात केली होती, उपोषणाला ग्रामस्थांचा शेकडोने पाठिंबा पहायला मिळाला होता.
शासकीय जमीन गट क्र.५२५ मधील एच-क्लास जागेवर सौर कृषी वाहिनी प्रकल्प नियोजित असून, सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध नसून, फक्त जागा स्थलांतरीत करण्याच्या मागणी तसेच फुले नगर येथे ग्रामपंचायत नमुना आठ अ मधील सरकार ही नोंद कमी करून मालक म्हणून संबंधित नागरीकांचे नावे लावण्यात यावे, फुले नगर येथील पात्र घरकुल लाभार्थ्यांना त्यांच ठिकाणी घरकुलांचा लाभ देण्यात यावा, अशा मागण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडून उपोषणकर्त्याना आश्वासन देण्यात आले. त्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्यासोबत उपोषणकर्त्याची भेट घेणार असून, जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, तसेच सौर कृषी प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी तहसीलदार अजित दिवटे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी बी.डी. घुगे यांनी सांगितले की, फुले नगर येथे ग्रामपंचायत नमुना आठ अ मधील सरकार ही नोंद असून, मालक म्हणून संबंधित नागरिकांना अतिक्रमण नियमाकुल करून देण्यासाठी तसेच पात्र घरकुल लाभार्थ्यांना त्यांच ठिकाणी घरकुलांचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. याच अटीवर उपोषण मागे घेण्यात आले आहे. यावेळी तलाठी झीने, ग्रामसेवक अमोल मेहेत्रे, उपोषणकर्ते शिवाजीराव काळुसे, मधुकर साळवे, ज्ञानेश्वर कायंदे, दीपक साळवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन मांटे, सर्जेराव गोरे, दत्ता साळवे, वसंतराव साळवे, नितीन सानप, गणेश मांटे, रामेश्वर काकड, गजानन जाधव, विश्वास उबाळे, बबन साळवे, भीमराव खाडे,भगवान उबाळे, अनिल लाडुबा साळवे, दीपक खाडे, मिलींद खाडे, माणिकराव साळवे, भास्कर सानप, जीवन साळवे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
————–