चिखलीतील पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या; अन्यथा आक्रोश मोर्चा!

admin 2 Min Read
2 Min Read

– चिखली शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख विलास घोलप आक्रमक!

चिखली (राजेश लोखंडे) – चिखली शहरात दि.१८ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे ख्वाजा नगर व सैलानी नगर भागातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. घरांतील साहित्य, वस्तू, निवासस्थान व उपजीविकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही अद्याप शासनाकडून मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, तात्काळ मदत न झाल्यास शिवसेना स्टाईलने आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

चिखली शिंदे गटाचे शहर प्रमुख विलास घोलप यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि पूरग्रस्त महिला-पुरुष नागरिकांनी चिखली तहसीलदार यांना आज (दि.१८) निवेदन दिले. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत, पाण्याचा निचरा आणि संरक्षणभिंतीचे काम हाती घेतले नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून आक्रोश मोर्चा काढेल, असा इशारा विलास घोलप यांनी प्रशासनाला दिला. निवेदन देतेवेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मायाताई मस्के, कैलास भालेकर, अनमोल ढोरे, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख सादिक काजी, शेख साहिल काझी, बाबुभाई, शिवाजी शिराळे, रामभाऊ देशमुख, मनोज वाघमारे, माजी शहर प्रमुख श्रीकांत टेहरे, अमर काळे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सौ. कल्पनाताई बोधेकर, सौ. देशमुखताई, विजया पाटील, शेख बबलू, विकी निकाळजे, विक्रांत नकवाल, सतीश हिवाळे, राका मेहेत्रे, विठ्ठल जगदाळे, अनिल जाधव, बंडू नेमाने, गजानन मस्के, शेख महबूब, मोबीन सय्यद, सय्यद समीर आदींसह सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि पूरग्रस्त महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पूरग्रस्त नागरिकांचा प्रशासनावरील संताप निवेदनावेळी उघडपणे दिसून आला. शासनाने तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला नाही, तर चिखली शहरात तीव्र आंदोलन पेट घेईल, अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. ‘पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करूनही नुकसानभरपाईचा एकही पैसा नागरिकांच्या हातात पोहोचलेला नाही. हे अन्यायकारक आहे. जर शासनाने तातडीने मदत जाहीर करून प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या हातात पोहोचवली नाही, तसेच पाण्याचा निचरा व संरक्षणभिंतीची कामे तातडीने हाती घेतली नाहीत, तर आम्ही शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरू. गरज पडल्यास प्रशासनाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल.’ असा इशारा चिखली शहर प्रमुख विलास घोलप यांनी प्रशासनाला दिला आहे.

Share This Article
Exit mobile version