– चिखली शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख विलास घोलप आक्रमक!
चिखली (राजेश लोखंडे) – चिखली शहरात दि.१८ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे ख्वाजा नगर व सैलानी नगर भागातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. घरांतील साहित्य, वस्तू, निवासस्थान व उपजीविकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही अद्याप शासनाकडून मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, तात्काळ मदत न झाल्यास शिवसेना स्टाईलने आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
पूरग्रस्त नागरिकांचा प्रशासनावरील संताप निवेदनावेळी उघडपणे दिसून आला. शासनाने तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला नाही, तर चिखली शहरात तीव्र आंदोलन पेट घेईल, अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. ‘पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करूनही नुकसानभरपाईचा एकही पैसा नागरिकांच्या हातात पोहोचलेला नाही. हे अन्यायकारक आहे. जर शासनाने तातडीने मदत जाहीर करून प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या हातात पोहोचवली नाही, तसेच पाण्याचा निचरा व संरक्षणभिंतीची कामे तातडीने हाती घेतली नाहीत, तर आम्ही शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरू. गरज पडल्यास प्रशासनाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल.’ असा इशारा चिखली शहर प्रमुख विलास घोलप यांनी प्रशासनाला दिला आहे.

