स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ची अंतिम डेडलाईन!

admin 3 Min Read
3 Min Read

– निवडणुकांना चार महिन्यांची मुदतवाढ देताना सर्वोच्च न्यायालयाची राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजावर नाराजी!
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला अंतिम निर्देश

नवी दिल्ली/मुंबई (आवेश तिवारी/बाळू वानखेडे) – महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज (दि.१६) महत्वपूर्ण सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, निवडणूक आयोगाला नोव्हेंबर २०२५ पर्यंत ईव्हीएम मशीन उपलब्ध करून द्याव्यात, अशाही सूचना देण्यात आल्या. दरम्यान, ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या ज्या मागण्या असतील त्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ देताना स्पष्ट केले. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यासाठी मुदतवाढ मागितल्यानंतर न्यायालयाने जानेवारी २०२६ अखेरपर्यंतचा अवधी दिला असून, यानंतर आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पार पडून निकाल जाहीर होणार आहेत.

ईव्हीएमची मागणी, कर्मचार्‍यांची मागणी यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवा, सर्व मागण्या कशा पूर्ण करता येतील, कामाचे टप्पे कसे असतील, यासंदर्भात न्यायालयाने आयोगाला वेळापत्रक दिले असल्याचे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. ‘मागील सुनावणीवेळी चार महिन्यांत निवडणुका घेऊ म्हणणार्‍या निवडणूक आयोगाचा हलगर्जीपणा झाल्याचे दिसत आहे’, अशी टिप्पणीदेखील सर्वोच्च न्यायालयाने केली. राज्य निवडणूक आयोगाने ईव्हीएमची अनुपलब्धता, आगामी काळातील सण-उत्सव, विद्यार्थी परीक्षांचे वेळापत्रक तसेच कर्मचार्‍यांची कमतरता या कारणांमुळे निवडणुका तातडीने घेणे शक्य नसल्याचे न्यायालयात मांडले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आयोगाने आणखी वेळ मागितल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सप्टेंबर ते जानेवारी एवढा मोठा अवधी का हवा? असा प्रश्नही न्यायालयाने आयोगाला विचारला. दरम्यान, ओबीसी आरक्षणामुळे यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने अखेर मुदतवाढ मंजूर केली असली तरी जानेवारी २०२६ अखेरीस निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे, की प्रथम जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका पार पडतील, त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका घेतल्या जातील. त्यामुळे पुढील काही महिन्यांत राज्यभर निवडणुकांचा माहोल रंगणार असून, आयोगापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं याआधी ठरवून दिलेली कालमर्यादा न पाळल्याबद्दल न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आणि ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले.


गेल्या काही वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता या निवडणुकांना गती मिळणार आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीनुसार, सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला ठराविक वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावीच लागणार आहे.

Share This Article
Exit mobile version