– बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले, अजित पाटील, प्रशांत डिक्कर यांच्या उपस्थितीत शेतीप्रश्नांवर होणार चर्चा!
पुणे (खास प्रतिनिधी) – शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी व शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा, या मागणीसाठी राज्यातील शेतकरी नेत्यांनी एकत्रित येत, शेतकरी हक्क परिषदेचे पुण्यात आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर या एकमेव तरूण शेतकरी नेत्याला वगळून ही परिषद घेतली जात आहे. ही शेतकरी हक्क परिषद येत्या शुक्रवारी (ता. ८) रोजी सकाळी साडेदहा वाजता नवी पेठेतील पत्रकार भवनात होणार आहे, अशी माहिती शेतकरी हक्क परिषदेचे संयोजक महेश बडे यांनी दिली आहे.
दरम्यान, महेश बडे यांनी रात्री उशिरा कळवले, की या कार्यक्रमाचे निमंत्रण आपण स्वतः रविकांत तुपकर यांना दिले होते. त्यांनी सांगतो सांगतो असं सांगितले, व शेवटपर्यंत काहीच सांगितले नाही.
राज्यातील सर्व शेतकरी नेते एकत्र येऊन ही शेतकरी हक्क परिषद घेत आहेत. परंतु, क्रांतीकारी शेतकरी संघटनेची स्थापना करून राज्यभर शेतकर्यांच्या प्रश्नांवर लढणारे युवा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मात्र या शेतकरी हक्क परिषदेपासून बाजूला ठेवण्यात आल्याचे (वायले ठेवल्याचे) दिसून येत आहे. यापूर्वी रविकांत तुपकर यांनी राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याची घोषणा पुण्यातूनच केली होती. त्यासाठी त्यांची बच्चू कडू यांच्यासोबत चर्चाही झाली होती. परंतु, या तिसर्या आघाडीचा प्रयोग तुपकरांच्या पातळीवर फिस्कटला व राजू शेट्टी यांनी या आघाडीची मोठ बांधत ती यशस्वी केली. शेतकरी हक्क परिषद ही त्याचीच फलश्रुती मानली जात आहे. रविकांत तुपकरांना जसे बाजूला ठेवल्या गेले, तसेच सदाभाऊ खोत यांनादेखील बाजूला ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, प्रशांत डिक्कर यांच्यासारख्या बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकरांच्या विरोधकाला राज्य पातळीवर व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ही शेतकरी हक्क परिषद करत असल्याचेही जाणवत आहे. तुपकर हे सद्या राजकीय संघर्षातून जात असल्याचे दिसत असून, स्थानिक पातळीवरदेखील त्यांच्यात व त्यांच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांत, विशेष करून चिखलीत मानसिक दुरी निर्माण झाली असल्याचे जाणवत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत त्यांची भूमिका काय राहणार? व त्यांना मतदार कितपत ‘रिस्पॉन्स’ देणार? हादेखील प्रश्न चर्चिला जात आहे. दुसरीकडे, पुण्यातील शेतकरी हक्क परिषद म्हणजे राज्यभर शेतकरी नेता म्हणून पुढे येण्यासाठी धडपड करत असलेल्या रविकांत तुपकरांना एकटे पाडण्याचा प्रकार ठरत आहे.

