– ‘शेतकरी मरतोय… आणि सरकार आकडे झाकतोय; शेनफड पाटील घुबे यांचा संतप्त सवाल
– बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ५० हजार शेतकरी आजही कर्जमाफीपासून वंचित!
बुलढाणा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – ‘२०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात विदर्भातील शेतकर्यांसाठी मृत्यूची छाया बनली होती. या काळात ३३ हजारांहून अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या, आणि त्यातील तब्बल ६५ टक्के आत्महत्या एकट्या विदर्भात!’ असा संतप्त आरोप ज्येष्ठ शेतकरी नेते शेनफड पाटील घुबे यांनी केला आहे. त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत म्हटले की, ‘शेतकरी मरण पावतोय, आणि सरकार आकड्यांच्या मागे लपून बसलंय.’
‘कोरा, कोरा, कोरा!’ – घोषणांची फसवणूक!
‘फडणवीस सरकारने ‘कोरा’ शेतकरी म्हणून जे वर्गीकरण केलं, त्यात दुहेरी लाभ घेणार्यांना दोनदा मदत मिळाली. पण ज्यांना एकदाही मदत मिळाली नाही, ते आजही कागद घेऊन सरकारी कार्यालयांत फेर्या मारत आहेत,’ असे घुबे म्हणाले. ‘महात्मा फुले कर्जमाफी योजना’ ही फक्त उद्धव ठाकरे सरकारच्या काळात प्रभावीपणे राबवली गेली, त्यामुळे अनेक गरजू शेतकर्यांना दिलासा मिळाला. ‘पण फडणवीस सरकारच्या योजनेत अटी-शर्तींच्या गोंधळात आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळेच लाखो शेतकरी मरणाच्या वाटेवर गेले,’ असा आरोप त्यांनी केला. ‘शेतकर्यांच्या सहनशीलतेचा अंत झालाय. सरकार जर अजूनही जागं होणार नसेल, तर शेतकरी आता उठेल, बोलेल आणि हक्कासाठी लढेल. कारण मरण्याच्या आधी एकदा जगून बघायचं असतं!’ अशा शब्दांत घुबे यांनी सरकारला थेट इशारा दिला.

